चंद्रपूर : पिण्याच्या पाण्याचे बॉटलमध्ये द्रव मिसळल्याच्या आरोपावरून शिक्षिकेने इयत्ता सातवीमधील १६ विद्यार्थींनीना मारहाण केली. ही घटना आज (दि.२८) सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सकाळी अकराच्या सुमारास घडली. त्यापैकी दोघींना श्वास घेण्याचा त्रास झाल्याने सावली येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास दोन्ही विद्यार्थींनीवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शिक्षिकेच्या विरोधात सावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे सातवीपर्यंत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. आज (शनिवारी) प्रार्थनेनंतर परिपाठ घेण्यात आला. शिक्षिका उज्वला पाटील यांनी पिण्याच्या पाण्याची बॉटल आणली होती. त्याच्या बॉटलमधील पाण्यात विद्यार्थ्यानी काही तरी द्रव मिसळल्याच्या त्यांना संशय आला. त्यावरून परिपाठानंतर इय्यता सातवीमधील विद्यार्थींनीना विचारपूस केली. परंतु कुणीही काही न सांगितल्याने त्यांनी संतापून एकापाठोपाठ एक १६ विद्यार्थींनीना मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
मारहाणीनंतर धनश्री हरीदास दहेलकर व लावण्या उमदेव चुधरी ह्या दोघी विद्यार्थींनीना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने स्थानिक उपचार करून सावली येथे हलविण्यात आले. सदर घटनेची माहिती गावात होताच पालक शाळेत जमा झाले. त्यांनी शिक्षिकेला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पालकांनी सावली पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. दोघी विद्यार्थींनीवर ग्रामीण रूग्णालयात दिवसभर उपचार करून सायंकाळी पाचच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला.