Nagbhid Taluka Paddy Theft
चंद्रपूर : नागभीड तालुक्यात शेतातून धानाच्या पोत्यांच्या चोरीच्या घटना वाढू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंधीचक येथील घटनेनंतर आता मांगरूड गावातही शेतासमोर ठेवलेल्या २१ धानाच्या पोत्यांसह ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून, या परिसरात धानचोरांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
नागभीड तालुक्यातील मांगरूड येथील शेतकरी यादव देवराव किन्नाके (वय ४५) यांनी नागभीड पोलिस ठाण्यात दिलेल्या तोंडी तक्रारीनुसार, त्यांच्या मालकीच्या शेतातील धान काढून १६ जून रोजी शेतासमोरील मंगरुळ-गोविंदपूर मार्गावर वाळवून ४० पोत्यांमध्ये भरून ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले होते.
१८ जून रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांनी पोत्यांची पाहणी केली असता सर्व ४० पोती जागेवर होती. मात्र १९ जून रोजी सकाळी पुन्हा पाहणीसाठी गेल्यानंतर पोत्यांची संख्या कमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मोजणी केली असता ४० पैकी २१ पोती गायब असल्याचे स्पष्ट झाले. आजूबाजूला शोध घेऊन तसेच परिसरातील नागरिकांकडे चौकशी करूनही धानाचा मागमूस लागला नाही.
चोरट्यांनी प्रत्येकी सुमारे १,५०० रुपये किमतीची २१ धानाची पोती, असा एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच ठिकाणी उभी असलेल्या मारोती रामदास उईके यांच्या ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एल ९८०५) मधील सुमारे ४ हजार रुपये किमतीची जुनी बॅटरीही चोरीला गेली. त्यामुळे एकूण ३५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, याच परिसरातील चिंधीचक गावातही यापूर्वी शेतात ठेवलेले धानाचे पोते चोरीला गेल्याची घटना घडली होती. याच मार्गावरील शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये ट्रॅक्टर द्वारे उद्या चोरून नेत असल्याचे आढळून आले होते मात्र अद्यापही त्या चोरट्यांच्या शोध लागलेला नाही. आता मांगरूड मधील चोरीमुळे या भागात धानाचे पोते चोरणारी टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनांमुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता निर्माण झाली असून, शेतात ठेवलेले धान सुरक्षित राहील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागभीड पोलिसांना या चोरीची माहिती देण्यात आली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. परिसरात रात्रीची गस्त वाढवून अशा चोऱ्यांना आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.