Chandrapur Financial Fraud Investigation
चंद्रपूर : देशभरातील ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींच्या तपासातून चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल सुमारे ३०० संशयित बँक खाती आणि एटीएमद्वारे झालेले सुमारे ४०० व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याने स्थानिक सायबर गुन्हे शाखेने तपासाची व्याप्ती वाढविली आहे. या प्रकरणी चंद्रपूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर आणि भद्रावती येथे प्रत्येकी एक असे चार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
देशभरातून १९३० राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) मार्फत राज्य सायबर समन्वय केंद्राकडे पाठविण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या विश्लेषणादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक बँक खात्यांचा वापर आर्थिक फसवणुकीसाठी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सायबर गुन्हे शाखेने सखोल तपास सुरू केला.
सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी संशयित खात्यांच्या व्यवहारांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासानुसार भद्रावती आणि बल्लारपूर येथील काही खात्यांमधून जवळपास एक कोटी रुपयांची रोकड काढण्यात आली, तर चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथील विविध एटीएममधूनही मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
या व्यवहारांमागील सूत्रधार, लाभार्थी आणि संपूर्ण आर्थिक साखळीचा शोध घेण्यासाठी सायबर पथकाने तपास अधिक तीव्र केला आहे. संशयित खात्यांची केवायसी कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज, एटीएम व्यवहारांचे तांत्रिक तपशील आणि अन्य डिजिटल पुरावे संकलित करण्यात येत आहेत. विविध बँका तसेच केंद्रीय तपास यंत्रणांच्या समन्वयाने संपूर्ण आर्थिक नेटवर्कचा मागोवा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी दिली.
सायबर गुन्ह्यांमध्ये 'म्युल अकाउंट'च्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांचे जाळे उभारले जात असल्याची शक्यता तपासली जात असून, तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.