चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील एका 'एमबीबीएस' च्या पदवीधर तरुणीने वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना चंद्रपुरात उघडकीस आली. ही घटना बुधवारी (दि.१७) घडली असून ईशा घनश्याम बिंजवे (२४) असे विद्यार्थींनीचे नाव आहे.
आपल्या जीवनाला कंटाळलेल्या ईशाने पहिल्यांदा नदीत उडी मारून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. पाणी कमी असल्याने ती बचावली. मात्र त्यानंतर पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा कायमची संपवली. यासंदर्भातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप कळले नाही. ती ब्रह्मपुरी येथील रहिवाशी होती.
ब्रम्हपुरी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. सद्या पावसाचे दिवस असल्याने नदी ओसाडून वाहत आहे. काल बुधवारी ईशा हिने जीवनयात्रा संपविण्याच्या उद्देशाने वैनगंगा नदीच्या पात्रात पुलावरून उडी घेतली. नदीच्या पात्रात पाणी कमी असल्याने ती बचावली. मात्र, जीवन संपविण्याचा निश्चय करून आल्याने तिने त्याच नदीमध्ये जास्त पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली. यावेळी मात्र या ठिकाणी नदीपात्रात पाणी ओसाडून वाहत असल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचा पुलावरून ये-जा करणाऱ्या व्यक्तींनी व्हिडीओ काढला. मात्र, वाचविण्यासाठी कुणीही धावले नाही. या तरूणीने आपले जीवन का संपविले. याचे कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरूणीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. तरुणीच्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.