पीक वाया गेल्याने शेतकऱ्याने उभ्या पिकात शेळ्यांना चरण्यासाठी सोडून दिले आहे. (Pudhari Photo)
चंद्रपूर

Chandrapur Farmers News | १२ एकरातील सोयाबीन पिकात शेतकऱ्याने सोडल्या शेळ्या: मदतीसाठी ढाळतोय अश्रू

अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्वप्नच उद्ध्वस्त

पुढारी वृत्तसेवा

Heavy rain farmers crisis

चंद्रपूर : अतिवृष्टीच्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्वप्नच उद्ध्वस्त केले. मेहनतीने उभे केलेले सोयाबीन आणि कापसाचे सोने सततच्या अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत. वरोरा तालुक्यातील केम गावातील शेतकरी अविनाश पावडे यांची व्यथा तर हृदय पिळवटून टाकणारी आहे. तब्बल १२ एकर सोयाबीन पीक वाया गेल्याने त्यांनी ते उभ्या पिकात पीक काढणीच्या ऐवजी शेळ्यांना चरण्यासाठी सोडून दिले. अजूनही पंचनाम्याचे निर्देश नाहीत. अधिकारी काही बोलायला तयार नाहीत, त्यामुळे डोळ्यातून अश्रू ढाळीत शेतकरी सरकारकडे मदतीची आस लावून बसले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या प्रमुख नगदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राजूरा व वरोरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या तालुक्यामध्ये सोयाबीन व कापूस हे प्रमुख पिक आहे. दरवर्षी अस्मानी सुल्तानी संकटाने शेतकरी होरपळून गेल्यानंतर येणाऱ्या हंगामात नवीन स्वप्न् बघतो. यावेळीही खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादकांनी दमदारपणे हंगाम करण्यासाठी कंबर कसली. शासकिय कर्ज, खासगी कर्ज, दागदागिने गहाण ठेवून पेरणी केली. परंतु प्रांरभीच्या काळात पावसाच्या चांगल्या सुरूवातीने शेतकरी आंनदला. त्यानंतर मात्र सततच्या अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्वप्नच उद्ध्वस्त झाले. सोयाबीन व कापसाचे कंबरडले मोडले.

चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन व कापूस उत्पादक भागातून वैनंगंगा व पैनगंगा ह्या दोन्ही नद्या वाहतात. वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर, कोरपना, राजूरा, जिवती, गोंडपिपरी आदी भागातील बहुतांश शेती नदीकाठावर किंवा आसपासच्या परिसरात आहे. आता पर्यंत सुमारे पाच ते सहा वेळी ह्या दोन्ही नद्यांना पुर आला. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. अनेक तास पिके पाण्यात तुंबल्याने कुजले, पिवळे पडले. त्यामुळे सोयाबीन पिकाला शेंगा आल्या नाहीत. ज्या शेंगा आल्या त्यांची फळधारणा झाली नाही. त्या शेंगा परिपक्व झाल्या नाहीत. काही भागात तर सततच्या अतिवृष्टीने शेंगाच आल्या नाहीत. हिच स्थिती कापसाची आहे.

बोंडआले परंतु पाण्याने त्याची नासाडी झाली. काही बोंडच कुजले. भयान वास्तव्याने शेतकरी प्रचंड हादरून गेला आहे. नगदी पिके म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन दसरा दिवाळी पर्यंत कापणीला येत होते. परंतु अतिवृष्टीने सोयाबीन कापण्यायोग्यच राहिला नाही. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती कापसाची नाही. त्यामुळे कापणीला येणार खर्च उत्पादनातून निघत नसल्याने पिके कापायची कशाला असा विचार शेतकऱ्यांच्या म्हणात घर करून बसला आहे. त्यामुळे शेतकरी त्या पिकांमध्ये जनावरे सोडण्यासाठी मागे पाहणार नसल्याचे चित्र समोर आले आहे.

वरोरा तालुक्यातील केम गावातील शेतकरी अविनाश गुलाब पावडे (वय ३५) यांची हीच व्यथा हदय पिळवून टाकणारी आहे. पावडे यांना 12 एकर जमीन आहे. त्यांनी सोयाबीनी पेरणी केली होती. पिके चांगले बहरू लागताच त्याच्या स्वप्नवर पाणी फेरले आहे. त्याच्या शेतात तब्बल १२ एकरांवर उभे असलेले सोयाबीन पीक अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाले. पिकाची काढणी करणे शक्य नाही इतके नुकसान झाले असून त्यातून खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेतातील पिक जनावरांना चारण्याचा निर्णय घेतला. पावडे यांनी पर्यायाने आपल्या शेळ्या सोयाबीनच्या पिकात सोडल्या. आता हे पीक मनाला वेदना देणारे ठरू नये म्हणून किमान जनावरांना तरी उपयोग व्हावा म्हणून हा निर्णय घ्यावा लागला," असे ते सांगतात.

चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाली असतानाही अजुन पर्यंत शासन प्रशासन त्यांच्या शेतावर पोहचले नाही. एैरवी शेती शाळा व अभ्यास दौऱ्याठी सगळेच शेतकऱ्यांच्या बांधावन जावून मोठी प्रसिध्दी मिळवून घेतात. परंतु आता मात्र सगळेच मुग गिळून असल्याच्या सतंप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत् आहेत. अजूनपर्यंत प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आलेला नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. योग्य वेळेत पंचनामा न झाल्यास मदतीचा लाभ मिळणार नाही अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. केवळ पावडेच नव्हे, तर चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर या पिकांच्या नुकसानीमुळे हवालदिल झाले आहेत. सलग अतिवृष्टी, शेतात पाणी साचणे, किडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्न जवळपास अर्ध्याहून अधिक घटण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी. बियाणे व खते अनुदानावर उपलब्ध करून द्यावीत. पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी. कर्जमाफीसह व्याजमुक्त कर्ज सुविधा देण्याच्या मागणी सोयाबीन व कापूस उत्पादकांनी केली आहे.

खूप खर्च करून बियाणे, खते घालून पीक उभे केले होते. आता सगळे पाण्यात गेले आहे. खरीप हंगामातील मेहनत वाया गेली. कुटुंबाची जबाबदारी कशी पार पाडायची, हा प्रश्न आहे. सरकारकडून तातडीने मदत मिळावी,अशी अपेक्षा आहे.
- अविनाश गुलाब पावडे (शेतकरी) मु. केम, ता. वरोरा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT