Gondpipri Stabbing Case
चंद्रपूर: किरकोळ वादातून एका युवकावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या वैभव साईनाथ आळे (वय 20) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथे घडली.
गावातील काही युवक नेहमीप्रमाणे मैत्रीपूर्ण चर्चेसाठी बसले होते. त्यावेळी जुन्या किरकोळ कारणावरून वैभव आळे (वय २०) व त्याचा मित्र परिमल झाडे यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद वाढत जाऊन मारहाणीत बदलला. त्याच दरम्यान परिमल झाडे याने वैभव आळे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात वैभव गंभीर जखमी झाल्याने गावकऱ्यांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तेथे शस्त्रक्रिये दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान हल्ला करणारा आरोपी परिमल झाडे (२२) हा फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.