चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (दि. २२) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून २१६ अर्जांची उचल करण्यात आली. मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. (Maharashtra Assembly Election)
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात ४४ अर्ज, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात ३१ अर्ज, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात ५६ अर्ज, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात ३४ अर्ज, चिमूर मतदारसंघात २४ अर्ज आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात २७ अर्ज असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून २१६ अर्जांची उचल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. २२ ऑक्टोंबरला निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर असून ३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत आहे. (Maharashtra Assembly Election)