Chandrapur Municipal Corporation Janvikas Sena
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाला असताना, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवनियुक्त नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. “आम्ही निवडणुकीपूर्वी काँग्रेससोबत युती केली होती आणि आम्ही शब्दाला जगणारे आहोत. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबतच आहोत आणि काँग्रेससोबतच राहणार,” असे स्पष्ट करत त्यांनी सत्तेपेक्षा सत्य आणि जनहिताला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीत विविध पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू असतानाच जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नवनियुक्त नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेससोबतची युती ही निवडणूकपूर्व असून, ती कोणत्याही परिस्थितीत तोडली जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.आमची युती ही फक्त काँग्रेससोबत नाही, तर चंद्रपूरच्या जनतेसोबत आहे. जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. आमची लढाई सत्तेची नसून सत्याची आणि जनतेच्या हिताची आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
भाजप सत्तेत असताना झालेल्या कथित भ्रष्टाचारावर तीव्र टीका करताना त्यांनी काँग्रेसमधील काही नगरसेवकांवरही गंभीर आरोप केले. “भाजप सत्तेत असताना जो भ्रष्टाचार झाला, त्याला काँग्रेसमधील काही लोकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समर्थन दिले. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही भ्रष्टाचाराला पाठिंबा देण्यात आला. असे नगरसेवक जर काँग्रेसने सोबत घेतले, तर आम्हाला तटस्थ राहण्याचा विचार करावा लागेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
तथापि, अशी परिस्थिती उद्भवणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “काँग्रेस चूक करणार नाही, यावर मला पूर्ण विश्वास आहे. जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांना सोबत घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करेल आणि जनविकास सेनेसह आघाडी करून महानगरपालिकेत एक पारदर्शक सरकार स्थापन करेल. आम्ही चंद्रपूरच्या जनतेला न्याय देऊ,” असे देशमुख यांनी सांगितले.
“काँग्रेसने चूक करू नये आणि आम्हीही चूक करणार नाही, हे आमचे शब्द आहेत. आम्ही शब्दाला जगतो,” या शब्दात त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने वेगळी भूमिका घेतली आहे, काँग्रेस आपली भूमिका मांडत आहे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी महापौरपदावर दावा ठोकला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जनविकास सेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.