डॉ. अविनाश वारजूकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला  Pudhari
चंद्रपूर

Chandrapur Politics | चंद्रपुरात काँग्रेसला धक्का : वारजूकर बंधूंचा भाजपमध्ये प्रवेश  

Congress leaders join BJP | प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश सोहळा

पुढारी वृत्तसेवा

Avinash Warjukar Satish Warjukar joins BJP

चंद्रपूर  : चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा चिमूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश वारजूकर यांनी आपल्या कुटुंबियांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या घडामोडीमुळे चिमूर विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपच्या विकासाभिमुख आणि जनहितकारी धोरणांवर श्रद्धा व्यक्त करत डॉ. अविनाश वारजूकर आणि सतीश वारजूकर यांनी कालच काँग्रेसचे सदस्य पदाचा राजीनामा देत मुंबई मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शंका उपस्थित केली जात होती. आज दुसऱ्याच दिवशी दोन्ही बंधूंनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

यांच्यासोबत यावेळी सतीश वारजूकर यांचा मुलगा आणि शंकरपूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच साईश सतीश वारजूकर आणि आणि डॉ अविनाश वारजूकर यांचा मुलगा पलाश अविनाश वारजूकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

वारजूरकर कुटुंबाची काँग्रेसमधील कारकीर्द

१९९९ ते २००४ या कालावधीत अविनाश वारजूकर हे चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत. तसेच राज्याच्या खनिकर्म विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये सचिव म्हणून काम पाहिले आहे. तर सतीश वारजूकर हे सलग तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य. २००९ ते २०१२ या कालावधीत जिल्हा परिषद अध्यक्ष एनपद भूषविले. नंतर काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. साईश वारजूकर यांनी २०२१ पासून शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचा कारभार सांभाळला आहे. युवक नेतृत्वात त्यांची सक्रिय भूमिका राहिली आहे.

वारजूरकर कुटुंबाने गेल्या दोन दशकांत काँग्रेसमध्ये विविध पातळ्यांवर काम करत चिमूर आणि परिसरात मजबूत संघटन उभारली होती. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे स्थानिक राजकारणात मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसला संघटनात्मक धक्का

वारजूकर कुटुंबियांचा चिमूर आणि परिसरात प्रभावी जनाधार मानला जातो. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या स्थानिक संघटनेला मोठा फटका बसू शकतो. विशेषतः चिमूर विधानसभा क्षेत्र आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे दूरगामी परिणाम दिसून येऊ शकतात.

भाजपसाठी राजकीय बळकटी

मुंबईतील सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वारजूकर कुटुंबियांचे स्वागत करत पक्ष बळकटीसाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. चंद्रपूर जिल्ह्यात भाजप आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असताना हा प्रवेश महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

एकूणच, वारजूरकर कुटुंबियांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT