चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने घराची भिंत अंगावर पडून दांपत्य गंभीर जखमी झाल्याची घटना फिस्कुटी येथे शनिवारी (दि.2) घडली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ते गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. अशोक मोहूर्ले (वय.56) आणि लता अशोक मोहूर्ले (वय.45) असे मृतक पती व पत्नीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपुरामध्ये ऑरेंज अलर्टच्या दिवशी शनिवारी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे दुपारी मोहूर्ले दाम्पत्य शेतातून घरी परत आले होते. यानंतर दोघेही मिळून स्वयंपाक करत होते.तेव्हा त्यांच्या घरालगतच जीर्ण झालेली एक भिंत मोहूर्ले यांच्या घरावर कोसळली. भिंत घरावर कोसळल्याने दोघेही भिंतीच्या मलब्याखाली गाडले गेले. या सोबतच चुलीवर कढईत मांडलेले गरम तेलही त्यांच्या अंगावर सांडले. त्यामुळे ते दोघेही गंभीर जखमी झाले.
भिंत कोसळल्याचा आवाज होताच शेजारी घटनास्थळी धावून आले. त्यानंतर भिंतीखाली दबल्या गेलेल्या माहूर्ले दांपत्याला भिंती खालून बाहेर काढण्यात आले. यामध्ये पती पत्नी गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांना तात्काळ मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान उपचारासाठी चंद्रपूर येथे नेत असताना पतीचा वाटेतच मृत्यू झाला. तर पत्नीचा रात्री उशिरा मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अशोक मोहूर्ले यांना दोन मुली होत्या. दोघींचीही लग्न झाल्याने मोहूर्ले दाम्पत्यच घरी राहत होते. या प्रकरणी मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.