यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे घराची भिंत पडून दुर्घटना घडली आहे. कळंब तालुक्यातील आष्टी येथे भिंत कोसळून सीता वामन कांबळे (वय.87) या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिंत पडल्याची घटना मंगळवारी (दि.23) घडली.
सीता कांबळे ही महिला कोपरा जानकर या गावाच्या मूळ रहिवासी होत्या. त्यांना एकच मुलगी असल्यामुळे त्या आपल्या मुलीकडे आष्टी येथे मागील काही वर्षांपासून राहत होत्या. दरम्यान मंगळवारी (दि.23) त्या घरामध्ये विश्रांती करत असताना अतिवृष्टीमुळे त्यांच्या अंगावर भिंत कोसळली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सदर महिलेचा मृतदेह कळंब ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. कळंब तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेकांच्या शेतात पाणी शिरले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच अनेक घरांची पडझड झाली आहे.