चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : लग्न समारंभ आटोपून परत येत असताना बोलेरो आणि सिमेंटचे वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला . हा अपघात शुक्रवारी दि.२३) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घुग्घुस-चंद्रपूर मुख्य मार्गांवर घडला. युसूफ नबिवस्ताद शेख, मुमताज युसूफ शेख, रफिक,नबीवस्ताद शेख, संजीदा रफिक शेख (रा. मोरेगाव, यवतमाळ) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील युसूफ नबिवस्ताद शेख, मुमताज युसूफ शेख, रफिक,नबीवस्ताद शेख, संजीदा रफिक शेख या चंद्रपूर जिल्हातील राजुरा येथे लग्न जमविण्यासाठी गेले होते. लग्न ठरवून कुटुंबासह परत येत असताना घुग्घुस-चंद्रपूर मुख्य मार्गांवरील नागला पुलाजवळ दुपारी दिड वाजताच्या सुमारास बेलोरा वाहनाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या सिमेंट कॅप्सूल ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की या धडकेत बेलोरा वाहनातील चौघाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाने घटनास्थळ गाठले. चौघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले.