बुलढाणा : पुढारी वृत्तसेवा
Buldhana Railway News : खामगांव ते जालना या १६२ कि. मी. अंतराच्या प्रस्तावित ब्राॅडगेज रेल्वेमार्ग निर्माणासाठी शेगांव,खामगांव, चिखली,सिंदखेडराजा व देऊळगाव राजा या पाच तालुक्यातील ५४ गावांच्या शिवारात आवश्यक भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरु होत आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडल कार्यालयाकडून बुलढाणा जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे भूसंपादन कार्यवाहीचे सहकार्य मागण्यात आले आहे.
त्यानुसार, विशेष भूसंपादन अधिकारी बुलढाणा आणि खामगांव, बुलढाणा व सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी हे विशेष सक्षम अधिकारी म्हणून रेल्वे कायद्यातील तरतुदीनुसार, संबंधित क्षेत्रातील जमीन मोजणी,मालकी हक्क पडताळणी, योग्य भरपाई निश्चिती, हरकतींची सुनावणी आणी भूसंपादन प्रक्रिया कायदेशिर, पारदर्शक व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची कार्यवाही करतील.
या खामगाव - जालना विशेष रेल्वेमार्ग प्रकल्पाची अधिसूचना २६ मे २०२६ रोजी भारत सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेली असून आता रेल्वे मार्गासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. शेगांव तालुक्यातील २, खामगांव तालुक्यातील १३, चिखली तालुक्यातील २०, सिंदखेड राजा तालुक्यातील ३ आणि देऊळगावराजा तालुक्यातील १६ गावे अशा एकूण ५४ गावांच्या शिवारात रेल्वेमार्गासाठी आवश्यक क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे.
यामध्ये शेगाव तालुक्यातील वरखेड खुर्द व पहूरजिरा, खामगांव तालुक्यातील जयपूर लांडे, शेलोडी, टेंभुर्णा, जनुना, जळका तेली, नागापूर, किन्ही महादेव,नायदेवी, लोखंडा,पाळा, शिराळा, गणेशपूर, निमखेड. चिखली तालुक्यातील वैरागड, उंद्री(उदयनगर), किन्ही सवडद, तोरणवाडा, मोहदरी, अमडापूर, टाकरखेड मुस्लिम (अमडापूर परगाणा),महिमळ, दहिगाव, बोरगाव काकडे, पेठ, अन्वी,बोरगाव वसू,शिंदे हराळी, खंडाळा मकरध्वज, कोलारा, रोहडा, मेरा खुर्द, भोरसा, आसोला(परगाणाखेर्डा).
सिंदखेडराजा तालुक्यातील जळगाव ,उगला,पिंपळखुटा, देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, धोत्रा नंदई (परगाणा मलकापूर पांग्रा),सरंबा, देऊळगाव मही,निमगाव गुरू, सावंगी टेकाडे, पिंपळगाव बु.,बामखेड, आसोला (परगाणा सिंदखेड),पळसखेड झाल्टा, बोराखेडी बावरा, अंभोरा, गिरोली खुर्द, पिंपळनेर, सावखेड भोई व भिवगाव बु.या गाव शिवारात भूसंपादन प्रक्रिया सुरू होत आहे.
प्रस्तावित रेल्वेमार्गाचे अंतिम संरेखन(अलाईनमेंट)यापूर्वीच निश्चित करण्यात आलेले आहे.या प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे स्थानिक उद्योग, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि भविष्यातील औद्योगिक गुंतवणुकीला नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.