President Murmu visit to Shegaon Buldhana
बुलडाणा : मन व शरीर स्वस्थ असले तरच उत्तम नागरिक व पर्यायाने सशक्त देश निर्माण होतो. यासाठी भारतीय प्राकृतिक उपचार पध्दतीचा वारसा असलेल्या आयुर्वेदाला विकसित करा व वनौषधींचे जतन संवर्धन करा, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी (दि.२५) शेगांव येथे आयोजित 'आयुष राष्ट्रीय आरोग्य मेळाव्या'चे उद्घाटन प्रसंगी केले.
या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले 'आयुष'चे वैद्य व विद्यार्थ्यांना संबंधित करताना राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, सर्वांना परवडणारी आयुर्वेद उपचार पध्दती ही ऋषीमुनींनी शोधलेली मोठी ठेव आहे. आपल्या स्वयंपाकातील अनेक घटक हे आयुर्वेद उपचारांचेच मूळ आहेत. सद्यस्थितीत अनेक कारणांनी वनक्षेत्र घटत चालल्याने आयुर्वेदात महत्वाचा घटक असलेल्या कित्येक वनौषधी नष्ट होत आहेत.
त्यावर उपाय म्हणून शेतकरी बांधवांनी वनौषधी लागवड करावी. यामुळे जमीनीचा पोत ही सुधारेल व शेतीतून उत्पन्नही वाढू शकेल. आपल्या भाषणातून राष्ट्रपतींनी आयुर्वेदासोबतच युनानी, होमिओपॅथी, योगा, सिध्द, नैचरोपैथी आदी उपचार पध्दतीबाबतही गौरवौद्गार काढले.
या आरोग्य मेळाव्याचे मंचावर राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री मकरंद पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर व अ.भा.आयुर्वेद संमेलन ट्रस्टचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्मा उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन समाधीस्थळाचे दर्शन, पूजा व आरती केली. संस्थानच्या वतीने टाळ- मृदंगाच्या निनादात राष्ट्रपतींचे स्वागत स्वागत करण्यात आले.