बुलढाणा : जिल्ह्यात रस्ते, दळणवळण व्यवस्था, पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. जिल्ह्यातील कृषी, सिंचन,औद्योगिक विकासाला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि.४) केले.
बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी,राजकीय पक्षाचे प्रतिनिधी,उद्योजक,खेळाडू आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी निवडक घटकांसोबत जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करुन शासनाच्या उपाययोजना सांगितल्या. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात,पोलीस अधिक्षक विश्व पानसरे हे उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल म्हणाले, बुलढाणा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी जिल्ह्यात नवे उद्योग प्रकल्प सुरु होणे गरजेचे असून त्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना राज्य शासनाला करणार आहे. औद्योगिक क्षेत्रात उद्योगासाठी जागा दिली जात असून त्यात स्थानिकांना संधी आहे. यातून जिल्ह्याचे सकल उत्पन्न वाढीस मदत होईल. तसेच मोठ्याप्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल, असेही राज्यपाल म्हणाले. जीगाव सिंचन प्रकल्प हा जिल्ह्यातील सिंचन क्षमता पूर्ण करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्णत्वास येत आहे. जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी जीगाव, वैनगंगा- नळगंगा नदीजोड सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याच्या राज्य शासनाला सूचना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.