भंडारा : शाळेमध्ये उगवलेल्या रोपांची फळे खाल्ल्याने नऊ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि.५) रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर चार विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गडेगाव येथील स्नेहल लोकेश राऊत, नेत्रा मोहन राऊत, अवनी सुधीर उईके, देवांशी प्रकाश नान्हे, प्राप्ती रूपेश बावणे, युग सरोद नंदेश्वर, शिवम धीरज उईके, मंथन जितेंद्र शेंद्रे आणि तन्मय प्रमोद कुथे यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे वय आठ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
बुधवारी (दि.4) ४ दुपारच्या सुट्टीमध्ये गडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शेजारी उगवलेल्या रोपांची फळे खाल्ली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना चक्कर येणे, खाज येण्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर नऊ विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तपास केल्यानंतर त्यांना फळांमधून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना काही काळ रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.