Spotted Deer Relocation Tadoba to Nagzira
भंडारा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातून ७३ चितळ आणण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता पुन्हा नवेगाव-नागझिऱ्यात ५०० चितळ आणण्यात येणार आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या एकसंघ निर्णयानंतर व्याघ्र संवर्धनाला गती मिळाली असून आणखी चार प्रवेशद्वार तयार केले जाणार आहेत. या प्रयत्नातून व्याघ्र संवर्धन आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव विभागाने वाघाचे संवर्धन, स्थानांतरण उपक्रम राबविला. पहिल्या टप्प्यात, २०२३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून दोन वाघीण आणि दुसऱ्या टप्प्यात, एप्रिल २०२४ मध्ये एक वाघीण अशा तीन वाघिणींचे स्थानांतरण करण्यात आले. त्यांचे भक्ष्य वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून चितळ स्थानांतरणाचाही प्रयोग यशस्वी ठरला.
सध्यास्थितीत या व्याघ्र प्रकल्पात १७ ते १९ वाघ आहेत. या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्यानंतर आता पुन्हा ५०० चितळ आणले जाणार आहेत. हे चितळ ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात येणार आहेत. सध्या त्याठिकाणी पिंजरे लावून चितळांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच, चितळांचे खाद्य वाढविण्यासाठी अखाद्य गवतांचे निर्मूलन करुन मोठ्या प्रमाणात ‘ग्रासलँड’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ‘ग्रासलँड’साठी बियाणे गोळा करण्यात आले असून पावसाळ्यात त्यांची लागवड होणार आहे.
तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढल्यानंतर वाघांसह अन्य मांसभक्षी प्राण्यांची संख्या वाढेल, त्यातून पर्यटनाला चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. सोबतच, वन्यजीवांसाठी आवश्यक त्याठिकाणी पानवठे, तलाव, शेततळेही बांधले जाणार आहेत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात ६५३.६७४ चौरस किलोमीटरचे कोअर क्षेत्र वन्यजीव विभागाकडे तर ६४८.२१ चौरस किमीचे बफर क्षेत्र प्रादेशिक विभाग व वनविकास महामंडळामध्ये विभागलेले होते. मागीलवर्षी राज्य सरकारने संपूर्ण १३०१.८८३ चौरस किमी क्षेत्राचे व्यवस्थापन आणि नियंत्रण थेट नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे वर्ग करुन या क्षेत्राला एकसंघ केले.
या निर्णयामुळे व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या प्रवेशद्वारांसह आणखी चार नवे प्रवेशद्वार तयार केले जाणार आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यात गडेगाव डेपो येथे तर उर्वरित गोंदिया जिल्ह्यातील पांगडी, जांभळी आणि गोरेगाव वनक्षेत्रात प्रवेशद्वार राहणार आहे. या प्रयत्नांमुळे पर्यटकांना विविध प्रवेशद्वारांमधून सफारी करण्याची संधी मिळणार आहे.
व्याघ्र प्रकल्पाच्या एकसंघ निर्णयाचा फायदा स्थानिकांना होणार आहे. लवकरच व्याघ्र प्रकल्पात ५०० चितळ आणले जाणार आहेत. त्याचे सकारात्माक परिणाम दिसून येतील. व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंग, नियमित गस्त, मानव-वन्यजीव संघर्ष निवारण, जलसंधारणाच्या कामांवर भर दिला जात आहे. त्यातून पर्यटनवाढ आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.- प्रितमसिंग कोडापे, उपसंचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प साकोली