Bhandara news
भंडारा: घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची ये-जा आणि चार दिवसांवर येऊन ठेपलेला शुभमुहूर्त... असे आनंदी वातावरण असताना लग्नापूर्वीच नवरदेवाने गळफास घेऊन जीवन संपवले. भंडारा जिल्ह्यात लाखांदूर तालुक्यातील परसोडी पावळदवना येथे ही घटना घडली. राजेश अविनाश भेंडारकर असे या मृत तरुणाचे नाव असून, या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजेश भेंडारकर हा तरुण चंद्रपूर येथील दालमिया कंपनीमध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. त्याचे लग्न १६ मार्च रोजी एरंडी येथील वैष्णवी दोनोडे या तरुणीशी ठरले होते. अवघ्या चार दिवसांवर लग्न आल्याने घरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास राजेशने घराबाहेरील आंब्याच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून जीवन संपवले. सकाळी हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या खरेदीसाठी नवरी मुलगी सुद्धा ११ मार्च रोजी राजेशच्या घरी आली होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना राजेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे विवाहाच्या आनंदाचे रूपांतर क्षणात शोकात झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पालांदूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.