चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमित शेत जमिनीवर वृक्षलागवड करून नये, याकरीता १० हजारांची लाच मागणाऱ्या महिला वनरक्षकासह तिच्या पतीला अटक करण्यात आली. ही कारवाई सावली तालुक्यातील कापसी रोपवन वाटीकेमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. शारदा रामदास कुळमथे असे वनरक्षकाचे नाव आहे. उपरी बिट ( ता.सावली) येथे त्या कार्यरत आहे. संजय अंताराम आतला (वनरक्षक महिलेचे पती) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार मौजा उपरी, (ता. सावली जि. चंद्रपुर) येथील रहीवासी असून शेतकरी आहेत. तक्रारदारांच्या वडिलांनी, १९८२ पासून मौजा कापसी येथील सर्वे क. ४३६ मधील ४४.९२ हे. आर. शासकिय जमिनीपैकी १.२१ हे. आर. वन जमिनीवर अतिक्रमण केले आहे. तेव्हापासून दरवर्षी त्या जागेवर खरीप हंगामात पीक घेतात. सावली तालुक्यातील उपरी बिटातील महिला वनरक्षक शारदा रामदास कुळमथे, यांनी तक्रारदाराच्या अतिक्रमीत वनजमिनीवर वनविभागा मार्फत रोपवन (वृक्ष लागवड) करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अतिक्रमीत जागेवर वृक्षलागवड न करण्यासाठी 10 हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घटनेची शहानिशा करून सापळा रचला. महिला वनरक्षक शारदा कुळमथे यांनी तक्रारदाराकडे तडजोडअंती १० हजाराची मागणी केल्यानंतर लाचेचा पहिला टप्पा ५ हजार रूपये देण्याचे ठरले. त्यानुसार वनरक्षक कुळमेथे यांचे पती संजय आतला (वय ४०) यांना कापसी येथे ५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस उपायुक्त राहुल माकणिकर, अप्पर पोलीस अधीक्षक मुधकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, नरेश नन्नावरे, रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे, पुष्पा कोचाळे यांच्या पथकाने केली.
हेही वाचा