Hamalpura Railway Bridge attack
अमरावती: शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्या हमालपुरा रेल्वे पुलावर गुरुवारी उशिरा रात्री एका २४ वर्षीय युवकावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून झालेल्या या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पवन विलास भगत असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणात विनोद सुर्यकांत अजबे (वय २५, रा. हमालपुरा) याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी यश काटे, अथर्व ऊर्फ रायबो सगणे, सर्वेश बिलबिले या तिघांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
विनोद अजबेंच्या तक्रारीनुसार, २६ मार्च रोजी रामनवमीनिमीत्त हमालपुरा येथून शोभायात्रा निघाली होती. त्यानंतर विनोद, व त्याचे मित्र पवन भगत आणि ऋतिक गणेश समरित असे तिघेही शोभायात्रेसाठी राजकमल चौकात गेले होते. त्यावेळी नाचत असताना त्यांचा यश काटे (ता.चिचफैल) व त्याचे मित्रे सर्वेश बिलबिले (रा.माळीपुरा) यांच्याशी वाद झाला. त्यावेळी शाब्दीक वाद शांत झाला. त्यानंतर विनोद, पवन भगत व ऋतिक असे तिघेही घरी जात होते.
दरम्यान बंद असलेल्या उड्डानपुलावर आरोपी यश काटेसह त्याच्या मित्रांनी वाद करून, पवनवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर ते पळून गेले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पवनला नागरिकांच्या मदतीने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) दाखल करण्यात आले.
मात्र, त्याच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, जखमीच्या जबाबावरून आरोपी यश काटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.