अमरावती, पुढारी वृत्तसेवा: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सर्वांचे लक्ष येत्या ४ तारखेला लागणाऱ्या निकालाकडे आहे. दरम्यान निकालापूर्वी काही एक्झिट पोल मध्ये भाजपा व एनडीएला बहुमत मिळत असल्याचे दाखविण्यात आले आहे. तर अमरावती मध्ये देखील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणाच विजय होतील असा कल दर्शविण्यात आला आहे. दरम्यान यावर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मोठं वक्तव्य करून गंभीर इशारा दिला आहे.
लोकसभेच्या निकालात अमरावतीसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये कल तुम्हाला दिसून येईल. चार तारखेला अमरावतीचा खासदार पंजा चिन्हावर महाविकास आघाडी- इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून निवडून येतोय. कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या. असा जर निकाल लागला नाही तर सिविल वर होईल, असा गंभीर इशारा आमदार ठाकूर यांनी दिला आहे.
एक्झिट पोल मॅनेज आहेत. काही लोकांना घाबरून एक्झिट पोल मध्ये तसा कल दिला जातोय, असं वाटतं आहे, असे देखील आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या. आमदार यशोमती ठाकूर रविवारी मेळघाट दौऱ्यावर होत्या. यादरम्यान त्या माध्यमांशी बोलत होत्या.
सरकारचं मेळघाट मध्ये वेड्या सारखं काम :
काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर ह्या दुष्काळ परिस्थिती पाहण्यासाठी जिल्ह्यातील मेळघाट दौऱ्यावर आहेत. अनेक गावात यशोमती ठाकूर यांनी पाणी टंचाई समस्या व रोजगार हमी योजनेचा आढावा घेत लोकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या ऐकल्या. यावेळी यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकार व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. सत्ताधाऱ्यांना लोकांची काळजी नाही,सरकार व अधिकारी हलगर्जीपणा करत आहे. सरकार वेड्या सारखं काम मेळघाट सोबत करीत आहे. त्यामुळे या गोष्टीचा निषेध करते, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. पालकमंत्री बेजबाबदारीने वागत आहे. मेळघाट मध्ये काही ठिकाणी कृत्रीम पाणी टंचाई निर्माण केली जाते आहे,असा आरोपही आमदार ठाकूर यांनी केला. त्यांनी मेळघाट मधील लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचं आश्वासनही दिलं.
विभागीय आयुक्त, प्रदेश काँग्रेस कमिटीला सोपविणार अहवाल
काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी समितीच्या वतीने चिखलदरा तालुक्यातील विविध गावांना भेटी देण्यात आल्या. विविध गावात पोहोचून तेथील दुष्काळ व पाणी टंचाईची पाहणी करण्यात आली. यावेळी चिखलदरा तालुक्यातील भगदरी, खडीमल, चुनखडी, तारूबांधा या गावांमध्ये दुष्काळ पाहणी समितीने दौरा केला. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात दुष्काळग्रस्त नागरिकांशी संवाद साधून पाणीटंचाईची माहिती घेण्यात आली. ही समिती आपला पाहणी अहवाल विभागीय आयुक्त आणि प्रदेश काँग्रेस कमिटीला सोपविणार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.