Ravi Rana on Uddhav Thackeray
अमरावती : अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत हनुमान चालीसा प्रकरणावरून मोठे वक्तव्य केले आहे. हनुमान चालीसा पठणाला विरोध केल्यामुळेच उद्धव ठाकरेंचे राजकीय साम्राज्य उद्ध्वस्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राणा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी जर सध्याच्या राजकीय संकटातून मुक्त व्हायचे असेल, तर त्यांनी आपल्या घरी हनुमान चालीसा पठण करावे आणि अमरावतीतील हनुमान गढी येथे येऊन दर्शन घ्यावे. “मी त्यांना विनंती करतो की सहपरिवार त्यांनी अमरावतीच्या हनुमान गढीवर येऊन हनुमान चालीसा पठण करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, ज्यांनी हनुमान चालीसाला विरोध केला आणि राज्यात धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशा नेत्यांची काय परिस्थिती झाली आहे, हे राज्याने पाहिले आहे. “जो हनुमान का नाही, श्रीराम का नाही, तो कोणत्याच कामाचा नाही,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
राज्यातील आगामी राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राणा यांनी भाकीत केले की, येणाऱ्या काळात केवळ भाजप आणि काँग्रेस हेच दोन प्रमुख पक्ष उरणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सुमारे 90 टक्के नेते भाजपच्या संपर्कात आहेत, असाही गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, अमरावतीतील हनुमान गढीच्या विकासासाठी मुख्यमंत्री यांनी 121 कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल राणा यांनी आभारही मानले. बजरंग बलीच्या कृपेने महाराष्ट्रावर येणारी संकटं दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राणा यांनी शेवटी पुन्हा एकदा आवाहन करत म्हटलं की, ज्यांना आपल्या जीवनातील आणि राज्यातील संकटांपासून मुक्त व्हायचे आहे, त्यांनी हनुमान चालीसा पठण करावे आणि अमरावतीतील हनुमान गढी येथे येऊन दर्शन घ्यावे.