Navneet Rana on Rajya Sabha Nomination : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप नेत्या नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवले जाईल, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने अखेर नवनीत राणा यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. "मी केवळ एखाद्या पदासाठी माझी विचारधारा कधीही बदलणार नाही," अशा स्पष्ट शब्दांत राणा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अजित पवार गटाकडून आलेल्या ऑफरचा आणि अटीचाही त्यांनी यात खुलासा केला आहे.
आपल्या पोस्टमध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे विशेष आभार मानले आहेत. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सुनेत्रावहिनी आणि पार्थदादा यांनी खऱ्या अर्थाने मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेचा फॉर्म भरला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. राज्यसभा खासदार म्हणून मी राष्ट्रवादीतर्फे संसदेत जावे, असे त्यांच्या मनात होते. त्यांच्या या चांगल्या भावनेबद्दल आणि त्यांनी माझा विचार केल्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे."
, "सुनेत्रावहिनी आणि पार्थदादा यांच्या मनात माझ्याबद्दल चांगली भावना होती की त्यांच्या पक्षात चांगले लोक आले पाहिजेत. परंतु, राज्यसभेची संधी मिळत असतानाही, त्यासाठी स्वतःची विचारधारा बदलून अन्य पक्षात जाण्याची अट मला मान्य नव्हती. मी केवळ पदासाठी माझी विचारधारा बदलू शकत नाही," असेही राणा यांनी म्हटलं आहे.
पक्षाने उमेदवारी दिली नसली, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे काम करणारी मी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता आहे. करिता मी कोणत्याही पदासाठी आपली विचारधारा बदलणार नाही, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले अहो.