Melghat Doma Ashram School Ghost Rumor
अमरावती : मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत भूत असल्याच्या अफवेमुळे तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी भीतीपोटी शाळा सोडून घर गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सात ते आठ दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील १५ ते १६ विद्यार्थ्यांचे वर्तन अचानक बदलले. विद्यार्थी जोरजोराने हसू आणि रडू लागले, तसेच रात्री घुंगरू वाजल्याचा आवाज आल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केला. आश्रमशाळेच्या अधीक्षका उज्ज्वला इंगळे यांनी ही माहिती मुख्याध्यापकांना दिली. ही बातमी गावात पसरताच भूताच्या अफवेने जोर धरला आणि विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. यात सर्वाधिक विद्यार्थी चिखलदरा तालुक्यातील एकतलाई गावातील आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'च्या राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे आणि प्रवीण देशमुख यांनी डोमा, पाचडोंगरी, खडीमल आणि चुनकडी या दुर्गम भागांत जाऊन पालक व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्वतः त्या आश्रमशाळेत रात्र घालवून तेथे कोणतीही अलौकिक शक्ती नसल्याचे स्पष्ट केले. अंनिसच्या समुपदेशनानंतर अनेक विद्यार्थिनी पुन्हा शाळेत जाण्यास तयार झाल्या आहेत.
२६३ मुले आणि ३४५ मुली निवासी शिक्षण घेत असलेल्या या आश्रमशाळेत एका विद्यार्थिनीने अचानक विचित्र वर्तन करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता ही लक्षणे इतर मुलींमध्ये पसरली. जोर जोरात ओरडणे, अचानक हसणे अशी ही लक्षणे होती.
तज्ज्ञांच्या मते हा प्रकार 'मास हिस्टेरिया' म्हणजेच तीव्र मानसिक तणावाशी संबंधित असावा. दरम्यान, एका विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी वसतिगृहात 'भूमका' (स्थानिक पुजारी) कडून पूजा-अर्चा केल्यामुळे विद्यार्थ्यांमधील भीती अधिकच वाढली होती. सध्या अंनिस आणि प्रशासनाकडून विद्यार्थ्यांमधील भीती दूर करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.