वाडा : वाडा तालुक्यातील लखमापुर या गावात एका वीस वर्षीय तरुणीने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे ही तरुणी पोलीस भरतीसाठी गेली असता अपात्रतेतून आलेल्या नैराश्यात तिने हे टोकाचे पाऊल उचलले असून या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
लखमापूर गावातील रुचिता संतोष पाटील ही तरुणी मागील अनेक दिवसांपासून पोलीस भरतीचा सराव करत होती. 14 फेब्रुवारी रोजी ती मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या भरतीसाठी गेलीअसता या भरतीमध्ये उंची कमी पडल्याने ती अपात्र झाली होती. वडिलांना मात्र तिने आपल्याला 43 गुण मिळाल्याची खोटी माहिती दिली होती. आपण दिलेली माहिती चुकीची असून आपण अपात्र झाल्याचे लवकरच घरी समजेल या भीतीने व यातून आलेल्या नैराश्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास गावानजीक असलेल्या एका विहिरीत तिने उडी घेऊन आत्महत्या केली.
गावातील एका नागरिकाने हा प्रकार तिच्या घरी सांगितला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाल्याने रुचिता हिचा मृतदेह हाती आला. वाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर वाडा पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत हा प्रकार नमूद असल्याचे साबळे यांनी सांगितले.