मोठागाव-मानकोली पुलावर रात्री 'राईड की रिस्क'? pudhari photo
ठाणे

Thane : मोठागाव-मानकोली पुलावर रात्री 'राईड की रिस्क'?

'लाईक्स'च्या नादात स्टंटबाजी; नागरिकांचा जीव धोक्यात, हुल्लडबाजीचं केंद्रस्थान

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली शहर : रात्रीचा अंधार, बाईकचा कर्णकर्कश आवाज, आणि सोशल मीडियावर 'लाईक्स' मिळवण्याचा नाद एवढंच पुरेसं असतं काही बेफिकीर तरुणांसाठी मोठागाव-मानकोली पुलावर जीवाशी खेळायला! शहराच्या वाहतुकीसाठी सोयीचा ठरलेला हा पूल आता तरुणांच्या स्टंटबाजी, मद्यपान आणि हुल्लडबाजीचं केंद्रस्थान बनला आहे. वेगवान बाईक रेस, 'व्हीली' करत केलेले स्टंट आणि दारूच्या नशेत उडणाऱ्या वाईक या सगळ्यामुळे पुलावरून जाणं नागरिकांसाठी दररोजचं संकट ठरू लागलं आहे.

'सुशिक्षितांचं शहर' अशी ओळख असलेल्या डोंबिवलीतून ठाणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासाला वेग देणारा मोठागाव मानकोली पूल आता सोयीपेक्षा धोक्याचं ठिकाण ठरू लागला आहे. नागरिकांचा प्रवास सुकर करणारा हा पूल तरुणांसाठी स्टंटबाजी, मद्यपान आणि रात्रीच्या हुल्लडबाजीचं केंद्र बनत आहे. रात्री उशिरा या पुलावर काही तरुण बाईकवर 'जीवावर उदार' स्टंट करताना दिसतात. वेगाने बाईक चालवणे, 'व्हीली' मारणे, अचानक ब्रेक दाबणे आणि इतर वाहनांच्या अगदी जवळून वेगात जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.

याचबरोबर, पुलाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांत मद्यपान करून गोंधळ घालण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व प्रकार विशेषतः रात्री ११ नंतर ते पहाटेपर्यंत सुरू असतात. "हा पूल वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, पण स्टंटबाजीमुळे तो इतरांसाठी धोकादायक ठरत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी," अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोठागाव-मानकोली पूल हा डोंबिवली-भिवंडी प्रवास सुकर करणारा दुवा असावा, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या तो तरुणांच्या बेफिकीरपणामुळे धोकादायक बनत चालला आहे. "प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली नाही, तर एखादा मोठा अपघात घडल्याशिवाय या समस्येकडे लक्ष दिलं जाणार नाही," अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

पुलावर रीलचा नाद खुळा !

या पुलाचा निसर्गरम्य परिसर सोशल मीडियावर 'रील' तयार करणाऱ्या तरुणांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहे. काही तरुण धोकादायक पद्धतीने स्टंट करत स्वतःचे व्हिडिओ शूट करतात. तसेच यापूर्वी याच पुलावर एक २५ वर्षीय तरुणाने सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवताना खाडीत उडी मारल्याची गंभीर घटना घडली होती. स्थानिक नागरिकांनी त्यानंतर तीव्र चिंता व्यक्त केली होती.

प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची गरज

या वाढत्या प्रकारांकडे वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ अपघातानंतर कारवाई करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुलावर कायमस्वरूपी पोलीस सुरक्षा, सीसीटीव्ही पाळत व्यवस्था आणि रात्रीच्या वेळी नियमित गस्त हवी, अशी मागणी डोंबिवलीकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT