Tribal Housing Pudhari
ठाणे

Tribal Housing: कोणी झोपडी देता का झोपडी? वाघाची वाडीतील आदिवासीबांधव घरकुलाच्या प्रतीक्षेत

वाघाची वाडी येथील आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

पुढारी वृत्तसेवा

टोकावडे: वाघाची वाडी येथील आदिवासी बांधव आजही घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. कोणी झोपडी देता का झोपडी, असे म्हणण्‍याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे वाघाची वाडी येथील आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहेत.

माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगुळ गव्हण साखरवाडी निरगुडपाडा, चिंचवाडी, थिदबी, सावर, आंबेमाळी, वाघवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. मात्र वाघाची वाडी येथील आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

साधारण ८ ते १० घरांची ही छोटी वस्ती असून, सावर्णेपासून सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतरावर वाघाची वाडी वसलेली आहे. घनदाट जंगलाच्या कुशीत असलेल्या या वाडीतील नागरिकांना आजही चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

रस्त्याच्या समस्येबरोबरच येथील आदिवासी कुटुंबांसमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाघवाडी येथील‍ संगिता इरनक व सरीता ज्ञानदेव धनगर यांना आज ही एका मोडकळीस आलेल्या घरात आपला उदारनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.

शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळेल आणि आपल्या डोक्यावर पक्के छप्पर येईल, या आशेवर अनेक कुटुंबे आजही वाट पाहत आहेत. मात्र, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही कधी होणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

पावसाळ्यात या भागातील परिस्थिती आणखी बिकट होते. खराब रस्त्यामुळे दळणवळणाची मोठी अडचण निर्माण होते. आजारपण, शाळा, रोजगार, दैनंदिन गरजांसाठी वाडीतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

कोणी झोपडी देता का हो झोपडी अशी मागणी करण्याची वेळ या गरीब कुटुंबांवर आली आहे. शासन विकासाच्या विविध योजना राबवत असल्याचे सांगत असले, तरी माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या अशा दुर्गम वाड्यांपर्यंत त्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहोचतोय का, हा प्रश्न कायम असल्याचे दिसून येत आहे.

विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी एकदा माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम वाडी-वस्त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन येथील परिस्थिती पाहावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वाघाची वाडीतील नागरिकांना चांगला रस्ता आणि पात्र कुटुंबांना तातडीने घरकुल मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रधानमंत्री यादी 'ड' यादी पूर्ण झाली आहे. त्यात नाव असल्याशिवाय लाभ देता येत नाही. २५/२६ लक्षांक तालुक्यालाच आला नाही. सुशिला धनगर यांचे नाव यादीमधून पाठवलेले आहे; परंतु ते मंजूर झालेले नाही.
- बाळू उंद्रू कोकणे, ग्रामसेवक ग्रुप ग्रा. पं. फांगुळगव्हण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT