डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशन परिसरात असलेल्या नदीकाठी मासे पकडण्याच्या धारदार गळात अडकलेल्या कासवाची स्थानिक नागरिक, वॉर फाऊंडेशनचे स्वयंसेवक आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तत्परतेमुळे सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.
आंबिवलीत एका कासवाच्या तोंडात मासे पकडण्याचा गळ खोलवर रूतल्याचे या भागातील जागरूक रहिवाशांच्या निदर्शनास आले. कासवाची अवस्था अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायी होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिकांनी तात्काळ वॉर फाऊंडेशनच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून मदतीची विनंती केली.
माहिती मिळताच वॉर फाऊंडेशनचे स्वयंसेवक प्रेम आहेर आणि सिद्धेश गणगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कासवाची बिकट स्थिती पाहून वेळ न दवडता त्यांनी त्याला पेट क्युअर अँड केअर या दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉ. धर्मराज रायबोले आणि डॉ. सिद्धी रायबोले यांनी कौशल्याने कासवाच्या तोंडात रूतलेला गळ कोणतीही अतिरिक्त इजा न करता बाहेर काढला. त्याचबरोबर त्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत कासव पूर्णपणे स्वस्थ असून नैसर्गिक अधिवासात जाण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत या कासवाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले.
नदी, तलाव किंवा पाण्याच्या स्रोतांजवळ मासेमारी करताना तुटलेले गळ, प्लास्टिक किंवा जाळी तशीच टाकू नयेत. अशा टाकाऊ वस्तूंमुळे जलचर आणि वन्यजीवांच्या प्राणाला धोका निर्माण होतो. परिसरात कोणताही जखमी वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी तातडीने प्राणिमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक प्रेम आहेर यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केले.
गळ/प्लास्टिकमुळे वन्यजीव धोक्यात
पावसाळ्यात नदी आणि तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. मात्र अनेक जण मासेमारीनंतर तुटलेले गळ, नायलॉनचे धागे आणि प्लास्टिक पाण्यातच सोडून देतात. यामुळे कासव, मासे आणि इतर जलचरांच्या तोंडात, पायात किंवा पोटात या वस्तू अडकून त्यांचा मृत्यू होतो. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते अशा मानवी हलगर्जीपणामुळे वन्यजीवांचे आयुष्य धोक्यात येत आहे. त्यामुळे पाणवठ्यांजवळ स्वच्छता राखणे आणि वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे. आंबिवलीतील कासवाची सुटका ही याच जनजागृतीची गरज अधोरेखित करणारी घटना आहे.