Thane vegetable farming pudhari photo
ठाणे

Thane vegetable farming : दमदार पावसामुळे जिल्ह्यात फळभाज्यांची लागवड फुलली

बळीराजा सुखावला ! पावसाच्या संततधारेमुळे भेंडी-पडवळ उत्पादनाला मोठा दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नेवाळी : ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावले असून फळभाज्यांच्या लागवडीला मोठे चालना मिळाली आहे. विशेषतः भेंडी, शिरोळे, पडवळ यांसारख्या फळभाज्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या हंगामात या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि यंदा पावसाची सुरुवात चांगली झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी तसेच शहापूर परिसरात फळभाज्यांची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा पावसाची संततधार आणि योग्य प्रमाणातील पाणी उपलब्ध झाल्याने पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजीपाला पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही सुधारण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

पावसाची संततधार थांबल्याने पिकांवर रोगाचे सावट ओढावण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र सद्य स्थितीत दमदार पाऊस असल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या काही वर्षांत पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. मात्र यंदाच्या हंगामात पावसाने सुरुवातीपासूनच साथ दिल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

योग्य वेळी पडणाऱ्या पावसामुळे सिंचनाचा खर्चही कमी झाला असून शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका झाला आहे. दादर,ठाणे,कल्याण, डोंबिवलीतील बाजारपेठांमध्ये येत्या काही आठवड्यांत भेंडी, पडवळ आणि इतर फळभाज्यांचा पुरवठा सुरु होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ताज्या भाज्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. एकंदरीत, पावसाच्या दमदार बटिंगमुळे ठाणे जिल्ह्यातील शेतीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT