डोंबिवली : रोज मरे त्याला कोण रडे ? अशी अवस्था मुंबईच्या लाईफलाईनची झाली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील कल्याणजवळ शुक्रवारी रात्रीच्या सुमारास लोकल रेल्वे रूळावरून घसरल्याने मुंबईकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली होती.
महागणपतीच्या टिटवाळा स्थानकातून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेल्या लोकलचा डब्बा रूळावरून घसरला. कल्याण रेल्वे स्टेशनजवळ लोकलचा डब्बा घसरल्याने कल्याण-कसारा रेल्वेमार्गावर मुंबईच्या दिशेला जाणारी लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांची सेवा ठप्प झाली. लोकलमधून उतरून काही प्रवाशांनी पटरी वरून चालत कल्याण गाठले.
या घटनेची माहिती मिळतात रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रूळावरून घसरलेल्या रेल्वेला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तथापि, रात्री उशिरापर्यंत रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिक विभागाकडून लोकलच्या डब्याला रूळावर आणण्याचे काम सुरू होते. तोपर्यंत जवळपास दोन तास उलटून गेले होते. या दोन तासांच्या कालावधीमध्ये कल्याणपासून टिटवाळा आसनगावसह कसाऱ्यापर्यंत लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबल्या होत्या. रात्री उशिरा लोकल पुढे मार्गस्थ करण्यात आली.