ठाणे: मुंबई महापालिकेकडून 10 टक्के तर एमआयडीसीकडून 15 टक्के अशी एकूण ठाणे शहरात 25 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उन्हामुळे विहिरी आणि बोअरवेल अशा पाण्याच्या स्तोत्रांवर देखील परिणाम झाल्याने ठाण्यातील अनेक मोठ्या सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
परिणामी या सोसायट्यांकडून साकेत येतील पाणी भरणा केंद्रामधून दररोज 75 ते 80 टँकरची मागणी होत आहे. याशिवाय दररोज हजारो रुपये खर्च करून खासगी टँकरचा देखील आधार ठाणेकरांना घ्यावा लागत आहे.
ठाण्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असून यामुळे या ठिकाणी राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी आहे. विशेष करून घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले असून या मोठ्या प्रमाणात मोठमोठी गृहसंकुले देखील उभी राहिली आहेत.
पालिकेकडून इमारती उभारण्यासाठी परवानगी दिली जाते मात्र याचा बोजा सोयी सुविधा पुरवताना होत असून पाण्यासारख्या मूलभूत सुविधांपासून ठाणे शहरातील तसेच घोडबंदर विभागातील नागरिकांना वंचित राहावे लागत आहे.
सध्या ठाणे शहरात पाण्याचे संकट अधिक गडद झाले असून सर्वसामान्य ठाणेकरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे साकेत येथे ज्या ठिकाणी टँकरमध्ये पाणी भरले जाते त्या ठिकाणी आजच्या घडीला दररोज ठाण्यातील सोसायटींकडून 75 ते 80 टँकरची मागणी होत आहे.
मागणी 627 एमएलडी, पुरवठा 590 एमएलडी
ठाणे शहरासाठी दररोज 627 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केवळ 590 एमएलडीच पाणी पुरवठा होत असल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे.
गुरुवार-शुक्रवार ठाण्यात पाणी नाही
एमआयडीसीच्या वतीने करण्यात येणाऱ्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहरातील काही भागांमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवार दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी दुपारी 12. वाजेपर्यंत हा शटडाऊन लागू राहणार आहे.
या कालावधीत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31) मधील काही भाग वगळता), कळव्यातील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
असा होतो टँकरने पाणीपुरवठा...
दररोज 75 ते 80 टँकरची मागणी
ठाणे महापालिकेकडून 15 ते 20 टँकर मोफत
त्यानंतर प्रत्येक टँकर मागे 1 हजार रुपये
10 हजार लिटर मागे 700 रुपये
खासगी टँकर माफियांमधून मनमानी वसुली