नेवाळी : शुभम साळुंके
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असतानाच शुक्रवारी पहाटे कल्याण-डोंबिवली शहरासह ग्रामीण भागावर दाट धुक्याची चादर पसरली होती. शहरातील रस्ते, मोकळी मैदाने तसेच ग्रामीण भागातील भात शेती धुक्याने व्यापून गेलेली होती. विशेष म्हणजे भातपिकांच्या पानांवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू दिसून आल्याने शेतकऱ्यांचे लक्ष या हवामान बदलाकडे लागले आहेत. मात्र सोमवार पासून पावसाचे आगमन होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ बदलापूरसह दिवा, १४ गावे, श्री मलंगगड परिसर तसेच लगतच्या गावांमध्ये पहाटेच्या सुमारास दाट धुके पाहायला मिळाले आहे. काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भातपिकांना आवश्यक असलेले पाणी कमी पडत आहे. भात पीक अद्याप निसवण्याच्या अवस्थेत आलेले नसताना पावसाचा खंड पडल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे भातपिकांना चांगली वाढ मिळाली होती. मात्र, सध्या पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पिकांच्या पुढील वाढीची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच पहाटे धुक्याचे प्रमाण वाढल्याने हवामानातील बदलांचा भात पिकांवर नेमका काय परिणाम होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर पहाटेच्या धुक्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागाचे वेगळे रूप शुक्रवारी पाहायला मिळाले आहे.
धुक्यात हरवलेली भात पीक आणि पिकांवरील दवबिंदू यामुळे निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले आहे. शहरी भागातून ग्रामीण भागाकडे सायकलींसाठी येणाऱ्या खेळाडूंना देखील दवबिंदूंचे फोटो काढण्याचा मोह आवरला गेला नसल्याचे चित्र शुक्रवारी पहाटे दिसून आले आहे.
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात ही स्थिती अगदी सामान्य आहे. या काळात हंगामी पश्चिमेकडील वारे हळूहळू कमजोर होऊ लागतात आणि रात्रीचे वातावरण अधिक शांत व निरभ्र बनते. मान्सूनमुळे जमिनीत पुरेसा ओलावा शिल्लक असल्याने रात्रीच्या वेळी जमिनीचे मोठ्या प्रमाणात विकिरणजन्य थंडकरण होते. त्यामुळे जमिनीच्या लगतची हवा तिच्या दवबिंदू तापमानापर्यंत थंड होते आणि परिणामी दाट जमिनीवरील धुक्याची निर्मिती होते. मान्सूनच्या हळूहळू होणाऱ्या ऋतू संक्रमणाचे सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान दिसणारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण वातावरणीय लक्षण आहे. तर गणपती आगमन वेळेस रविवार सोमवार पाऊस असेल... कमी दाबाचे क्षेत्राच्या प्रभावमुळे !
- अभिजित मोडक, हवामान तज्ज्ञ, कोकण विभाग