ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात वातावरणात बदल जाणवू लागले आहेत. हवेतील आर्द्रतेसोबतच धूलिकणांचे प्रमाणही वाढले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत असून सर्दी, खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी अशा तक्रारींनी ठाणेकर नागरिक त्रस्त झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यात दसऱ्यापर्यंत सतत पडणारा पाऊस थांबल्यानंतर गेल्या आठवड्यात 3 ते 4 दिवस कडक उन्हाने तापमानात वाढ झाली. आता पुन्हा वातावरणात मळभ निर्माण झाले असून हवेतील धुळीकामांचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर झाला असून, शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सर्दी , खोकला, घसादुखी आणि अंगदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या काही दिवसांत सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये तब्बल 30 ते 40 टक्के वाढ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. “सामान्य सर्दी, ताप, घशातील संसर्ग आणि श्वसनास त्रास अशा लक्षणांसह येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,“ असे ते म्हणाले.
खासगी दवाखान्यांमध्येही हीच परिस्थिती दिसून येत आहे. दिवसभरात सरासरी 10 ते 15 रुग्ण सर्दी-खोकल्याचे उपचार घेण्यासाठी येत असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. ग्रामीण भागातसुद्धा ही लाट पोहोचली असून सर्दी, खोकला आणि घसा दुखण्याचे रुग्ण वाढले आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.
ही काळजी घ्या
पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ घेत राहावेत, शरीर हायड्रेटेड ठेवा.
गरम पाण्याच्या वाफेचा उपयोग करा, कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.
धुळीत जाणे टाळा; बाहेर पडताना मास्कचा वापर करा.
हात वारंवार धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक.
पौष्टिक आहार, फळे, भाज्या आणि व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ सेवन करावेत.
लक्षणे वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या; स्वतः औषधे घेऊ नयेत.
बदलत्या हवामानाचा परिणाम केवळ सर्दी-खोकल्यावरच नाही, तर दमा, ॲलर्जी आणि सायनस असलेल्या रुग्णांवर अधिक प्रमाणात होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.