ठाणे : ठाणे जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पावसाने जोर धरला असून उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदी काठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीच्या आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. (Thane Rain Update)
यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई दूरदृष्यप्रणालीद्वारे तर अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसिलदार अभिजीत खोले, संजय भोसले हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
याशिवाय ठाणे जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेचे क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृष्यप्रणाली द्वारे उपस्थित आहेत. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन सकाळी भरलेल्या शाळा मधली सुट्टीनंतर सोडण्यात आल्या. प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर करीत दुपारचे सत्र बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.