ठाणे : ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या न्यायालयात सुरु असलेल्या लाच प्रकरणी न्यायालयात सादर पुरावें आणि साक्षीदार ग्राह्य धरून सरकारी वकील असलेल्या संध्या बच्छाव यांना 6 महिन्याचा कारावास आणि 1 हजाराचा दंड अशी शिक्षा 30 जानेवारी, 2026 रोजी ठोठावली. या प्रकरणात सरकारी वकील संजय मोरे यांनी युक्तिवाद करुन न्यायालयात 5 साक्षीदार तपासले.
नवी मुंबईच्या वाशी पोलीस ठाण्यात तक्रारदार महिला राधा हर्षदराय पारेख यांच्यावर 2014 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात सरकारी वकील म्हणून संध्या बच्छाव या युक्तिवाद करीत होत्या. न्यायालयात कणखरपणे युक्तिवाद करण्यासाठी सरकारी वकील बचाव यांनी तक्रारदार बारीक यांच्याकडे 50,000/- ची मागणी केली होती. ठरलेल्या रकमेपैकी दहा हजार रुपये घेताना बच्छाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. सरकारी वकील संध्या बच्छाव यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरण हे ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या न्यायालय समोर अंतिम सुनावणी करता प्रकरण आले होते. या खटल्यात सरकारी वकील म्हणून संजय मोरे हे न्यायालयात युक्तिवाद करीत होते. या संपूर्ण खटल्यात न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केलेले घटनास्थळाचे पुरावे तसेच न्यायालयात पाच साक्षीदार तपासून त्यांच्या नोंदविलेल्या साक्षी आदींना ग्राह्यधरीत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी संध्या बच्छाव यांना दोषी ठरवीत सहा महिन्याच्या कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड 30 जानेवारी 2026 रोजी ठाणे न्यायालयात शिक्षा ठोठावली.
दंडाची रक्कम न भरल्यास दोन महिन्याचा अतिरिक्त कारवास भोगावा लागेल असे निकालात नमूद करण्यात आले आहे. सदर खटल्यात सरकारी वकील संजय मोरे, तात्कालीन तपासअधिकारी पोलीस निरीक्षक विलास चौगुले, सध्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक कारोटे, पोलीस निरीक्षक कावळे, कोर्ट अंमलदार महिला पोलीस हवालदार अनिता उमेश पाटील, पोलीस हवालदार ठाकरे, पोलीस हवालदार ठाकरे यांनी मोलाचे सहकार्य केले.