ठाणे: ठाणे शहरात रविवारी जेन-झीच्या तरुणांनी रस्त्यावर उतरून बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई आणि बलात्काराच्या घटनांविरोधात संताप व्यक्त करत अनोखे कॉक्रोच आंदोलन छेडले. मासुंदा तलाव परिसरात झालेल्या या आंदोलनात रॅप साँग, फ्लॅशमॉब, घोषणाबाजी आणि मेलोडी चॉकलेट वाटपाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली.
या आंदोलनात मोदी आणि मेलोनी यांच्या वेषभूषेत आलेल्या तरुण-तरुणींनी लक्ष वेधून घेतले. त्यांनी उपस्थितांना मेलोडी चॉकलेट वाटत मेलोडी नव्हे, बेरोजगारीचे प्रमोशन सुरू आहे, असा टोला लगावला.
आंदोलनस्थळी पेपर लीक की ये सरकार, नहीं चाहिए अबकी बार, परीक्षा नहीं व्यापार, पढ़े-लिखे हैं बेरोजगार अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशातील तरुणांना झुरळ संबोधण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी उदयास आली. शिक्षण घेऊनही नोकऱ्या नाहीत, तरुण वैफल्यग्रस्त झाले आहेत. अशा तरुणांना कॉक्रोच म्हणणे योग्य नाही, असे ते म्हणाले.
मनोज प्रधान यांनी, कॉक्रोच जनता पार्टी ही कोणत्याही राजकीय पक्षाची संघटना नसून सरकारविरोधातील भावना आहे. हे आंदोलन करणारे तरुण आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यांनी मदतीची विनंती केल्याने आम्ही सहभागी झालो, असे स्पष्ट केले.
तसेच अकाउंट हॅक कराल, पण तरुणांच्या डोक्यातील रोष कसा लॉक कराल, असा सवालही केला. अभिजित पवार यांनीही सरकारवर टीका करताना, आजच्या आंदोलनातून तरुणांचा आक्रोश दिसून आला आहे. आम्हालाही कॉक्रोच म्हटले जात असेल, तर आम्हीही त्या आंदोलनाचा भाग आहोत, असे सांगितले.