माता-बालमृत्यूचे संकट  file photo
ठाणे

Thane News | माता-बालमृत्यूचे संकट पालघरवर कायम !

पुढारी वृत्तसेवा
पालघर : निखिल मेस्त्री

जिल्ह्यात गेल्या अकरा वर्षांत ४०१९ बालमृत्यू झाले असून, १४९ मातांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंना कुपोषणासह विविध कारणे जवाबदार आहेत. गेल्या तीन वर्षांत पालघर जिल्ह्यातील मृत्यूंचा आलेख कमी होत चालल्याचा दावा आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी व वाडा या भागांत कुपोषणाबरोबरीने बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे.

  • अकरा वर्षांत ४०१९ बालकांचा तर १४९ मातांचा मृत्यू

  • सर्वाधिक बालमृत्यू मुदतपूर्व प्रसूतीमुळे

  • गेल्या तीन वर्षांत पालघर जिल्ह्यातील मृत्यूंचा आलेख कमी होत चालल्याचा दावा आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील बालके किंवा माता परजिल्ह्यात दगावली. तर त्यांची नोंद जिल्ह्यात होत नसल्याने आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे. तत्कालीन ठाणे जिल्हा असताना जव्हारमधील वावर-वांगणीमध्ये कुपोषण व बालमृत्यूच्या आकडेवारीचा स्फोट झाला होता. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून या प्रकाराबाबत संताप व हळहळ व्यक्त झाली. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागे झाला व कोट्यवधीचा निधी ग्रामीण भागासाठी कुपोषण निर्मूलनाच्या नावाखाली येत गेला. ग्रामीण भागांमध्ये बालविवाहासारख्या अनिष्ट रूढी-परंपरा अजूनही कमी झालेल्या नाहीत.

आता पर्यंतच बाल-मृत्यू प्रमाण

पालघर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत पाचशेहून अधिक बालविवाह झाल्याचे अलीकडे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले होते. न्यायालयानेही या संदर्भात राज्य शासनाला फटकारले होते. बालविवाहांमुळे कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू यांसारखे गंभीर परिणाम समोर येत आहेत.

माता-बाल मृत्यूचे कारण

कुपोषण, कमी दिवसांत जन्मलेले बाळ, कमी वजनाचे बाळ, इतर आजार, अपघात, कोंडणे अशा विविध कारणांनी ० ते ६ वर्षाच्या बालकांचा मृत्यू होत असल्याचे तज्ज्ञमार्फत सांगण्यात येते, तर रक्तक्षय, मुदतपूर्व प्रसूती, शारीरिक कमजोरी, हृदयविकार अशा कारणांमुळे माता मृत्यू होत आहेत.

२०१४ ते २०२४ (जून) पर्यतचे तालुकानिहाय बालमृत्यू

  • मोखाडा - ३४१

  • जव्हार - ११००

  • विक्रमगड - ३९०

  • वाडा - ४०७

  • पालघर - ४९४

  • तलासरी - २६१

  • डहाणू - ९०९

  • वसई - ९१

गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींनी केलेले प्रयत्न, आरोग्य विभागासह इतर विभागांच्या समन्वयामुळे व जनजागृतीमुळे बालमृत्यू कमी होत आहेत. राज्याच्या व राष्ट्रीय पातळीवरील मृत्युदरापेक्षा पालघर जिल्ह्यातील मृत्युदर अत्यल्प आहे. मात्र, मृत्यू होऊ नये हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत.
डॉ. सागर पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT