ठाणे

Raj Thackeray : सणासुदीच्या काळात दंगलीची भीती; सतर्क राहा-राज ठाकरे

Thane news: महाराष्ट्राने इतर राज्यांमधील काही प्रथा अंधपणे स्वीकारण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्यात सणासुदीचे दिवस सुरू होत असताना धर्म आणि जातीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी काळात प्रत्येकाने सतर्क आणि जागृत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षण, रोजगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून जनतेला धर्माच्या मुद्द्यात गुंतवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ठाण्यात गडकरी रंगायतन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी वाढत्या ध्वनिप्रदूषणावरही भाष्य केले. गणेशोत्सवात मोठ्या श्रद्धेने गणपतीची स्थापना केली जाते. मात्र, विसर्जनाच्या वेळी मोठमोठे डीजे लावून उत्साह साजरा करण्याची पद्धत वाढत आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश काय होता आणि आज आपण हा उत्सव कुठे नेऊन ठेवला आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राने इतर राज्यांमधील काही प्रथा अंधपणे स्वीकारण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

नवी मुंबईत होणाऱ्या हिंदी संमेलनावरही राज ठाकरे यांनी टीका केली. या संमेलनाकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन त्यांनी केले. हिंदी संमेलनामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंदी अधिक चांगली होणार नाही, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.

देशाच्या आर्थिक विकासाच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जीडीपी सात टक्क्यांनी वाढत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष आकडे वेगळे असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. तसेच डीजेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला सवाल केला. मुख्यमंत्री डीजे कायद्याच्या कक्षेत येत नाही, असे म्हणत असतील, तर नागपुरात डीजेवर बंदी का घालण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. धर्माच्या नावावर समाजात विष पेरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एसआयआर मोहिमेवरूनही सवाल

मतदारयादीच्या विशेष पुनरावलोकनाच्या मोहिमेवरून राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. राज्यभरात दोन कोटींपेक्षा अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जर इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदार मृत असल्याचे सांगितले जात असेल, तर राज्यातील प्रत्येक स्मशानभूमी सतत धगधगत असायला हवी, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर समाजात कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहावे. धर्माच्या नावावर बेधुंद होऊ नका. धर्मांधता वाढवून जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे. शिक्षण, रोजगार, शेतकरी आणि जनतेच्या दैनंदिन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT