ठाणे : पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक लढताना उमेदवारांनी आपल्या वाहनांवरचा दंड भरून थकबाकी नसल्याबाबतचा दाखला घेणे आवश्यक आहे. अन्यथा, दंड थकीत असल्यास उमेदवारी अर्ज बाद ठरणार आहे. उमेदवारीवर संक्रांत येऊ नये म्हणुन आपल्या वाहनांवरील पेंडिंग ई-चलान क्लिअर करण्यासाठी उमेदवारांची धावाधाव सुरु झाली आहे. ठाण्यात एका इच्छुक उमेदवाराने चक्क दीड लाख दंड भरून निवडणूकीचा मार्ग मोकळा केला आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर तसेच भिवंडी महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार पालिका निवडणुकांसाठी उमेदवार म्हणून अर्ज करताना, तुमच्यावर अनधिकृत बांधकामे केल्याचा अथवा शासन व प्राधिकरणांचे अन्य कर व दंड शुल्क थकीत नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्या नुसार वाहनांवरील ई चलन देखील दंड थकीत असु नये. असा नियम आहे.
ई चलन दंड भरला आहे की नाही, हे निवडणुक अधिकारी तपासणार आहेत. या संदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्यास उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात गर्दी होऊ लागली आहे. एका इच्छुकाने तर मंगळवारी आपल्या वाहनावरील तब्बल दीड लाख ई चलान दंड भरून आपली उमेदवारी निर्धोक केल्याचे वाहतुक विभागातील सुत्रांनी सांगितले.
दंड भरण्यासाठी धावाधाव सुरू
उमेदवारी अर्ज भरताना वाहन संबंधित सर्व कागदपत्रे अद्ययावत असावित. अर्जांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि कागदपत्रांचीही तपासणी केली जाते. थकीत दंडामुळे उमेदवारी अर्ज प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जे उमेदवार पालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी थकीत ई-चलन दंड भरण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.