ठाणे : सोमवारी झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय महासभेत पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये वादंग पाहायला मिळाले. भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मागील 3 वर्षात राज्य शासनाकडून आलेला निधी हा ठराविक नगरसेवकांना दिला गेल्याचा आरोप केला. ते यावरच थांबले नाहीत तर शाखा प्रमुखांना देखील निधी दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेनेत याच मुद्यावरुन सभागृहात शाब्दीक चकमक झाली. अखेर महापौर शर्मिली पिंपळोलकर यांनी या संदर्भातील ठोस पुरावे सादर करा, असे सांगत सभागृह शांत केले.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत शहरातील मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. शहराची लोकसंख्या सुमारे 27 लाखांच्या घरात पोहोचली असताना सार्वजनिक वाहतुकीसाठी बससेवा अपुरी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्या बस खरेदीत पारदर्शकतेचा अभाव असून जुन्या भंगार बस विकून नवीन बस घेण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. मराठी शाळांची दुरवस्था हा देखील गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. शाळांना निधी दिला जात असला तरी त्याचा योग्य वापर होतो का, यावर लक्ष ठेवले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याचेही त्यांनी निदर्शनास
आणून दिले. मालमत्ता कराबाबत 2009 साली झालेल्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत वाणिज्य मालमत्तांवर दुप्पट कर वसुली झाली असती तर महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली असती, असे त्यांनी सांगितले. शहरातील वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांकडे लक्ष वेधत दिवा स्वप्न दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामांवर खर्च करा, असा सल्ला त्यांनी प्रशासनाला दिला. घनकचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार असल्याचा गंभीर आरोप करत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा दावा त्यांनी केला. ऋतू पार्क येथील खत प्रकल्प बंद असणे, ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात पार्टनशीप असणे, पंपिंग स्टेशनवरील पाण्याच्या प्रक्रियेत त्रुटी, 72-ब निधीचा गैरवापर, 10 कोटी रुपये खर्चून पक्षीगृह उभारण्याच्या योजनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
साईराज इमारतीतील रहिवाशांना घरे दिल्यानंतरही त्यांच्यासाठी अतिरिक्त जमीन आरक्षित केली जात असल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला. अपूर्ण कामांचे बिल अदा केल्यामुळे महापालिकेच्या दायित्वात वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी शाखा प्रमुखांना देखील प्रशासकीय काळात निधीचे वाटप झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या या विधानावर शिंदे सेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी आक्षेप घेत अशा पध्दतीने शाखा प्रमुखांवर आरोप करणे अयोग्य असल्याचे सांगितले. आम्ही जर नावे घेतली तर वाद होतील असा इशारा नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिला. तर सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी आरोप-प्रत्यारोप टाळून अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचे आवाहन केले.महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी या सर्व आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनोहर डुंबरे यांनी केलेल्या आरोपांचे ठोस पुरावे सादर करावेत, असे निर्देश दिले.
मागील तीन दिवस अर्थसंकल्पावर महासभेत चर्चा सुरु आहे. परंतु या महासभेत भाजपचे सर्वच नगरसेवक हे चौकीदाराच्या भुमिकेत असल्याचे दिसून आले. मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, वैभव कदम, सुरेश कांबळे, नारायण पवार यांच्यासह भाजपच्या बहुसंख्य नगरसेवकांनी मागील तीन वर्षातील खर्चाचा हिशोबासह शहरातील समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सत्तेत सहभागी झालो तरी प्रशासनाच्या कामकाजावर आणि सत्ताधारी शिंदे सेनेच्या कारभारावर वेळ प्रसंगी चौकीदाराच्या भुमिकेत आम्ही असू असा इशारा यापूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारी सभा सुरु असतांनाच सभागृहाचे कामकाज पाहण्यासाठी संजय केळकर यांनी सभागृहात हजेरी लावली. यावेळी आपल्या पक्षासह इतर पक्षातील नगरसेवक काय भुमिका मांडतात, याकडे त्यांनी लक्ष दिले.