ठाणे: आपल्या वादग्रस्त कामामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाचा आणखी एक कारनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी समोर आणला आहे. अर्थसंकल्पाला अद्याप मंजुरी मिळाली नसताना मंजुरीपूर्वीच अत्यावश्यक कामाच्या नावाखाली तब्बल 250 कोटींचा खर्च ठाणे महापालिका प्रशासनाने केला आहे.
ही केवळ सर्वसामान्य ठाणेकरांच्या पैशांची लूट असल्याचा आरोप मुल्ला यांनी केला आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी 2026 - 27 वर्षाचा 6 हजार 221 कोटींचा अर्थसंकल्प 23 मार्चला सादर केला.
अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याकरिता तीन दिवस सभा सुरू होती. या अर्थसंकल्पाला 31 मार्चपर्यंत पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देणे आवश्यक असते. यामुळे अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी 25, 27 मार्च रोजी विशेष अर्थसंकल्पीय चर्चा सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 18 तास रेकॉर्डब्रेक महासभा 31 मार्चला पार पडली.
दरम्यान, या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्यापूर्वीच प्रशासनाने 72 ब या अत्यावश्यक आणि आपत्कालीन कामांच्या नावाखाली 250 कोटी खर्च केले असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक नजीब मुल्ला यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये केला. दरम्यान, शासनाकडून आलेल्या निधीवर कुणी डल्ला मारला, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
विकासकामासाठी निधी कधी मिळणार?
तब्बल 6 हजार 221 कोटींच्या अर्थसंकल्पात 250 कोटींची कपात नेमकी कुठल्या तरतुदीतून करण्यात आली, यावरून अजित पवार गटाचे मुल्ला यांनी प्रशासनाला धारेवर धरले. सर्वसाधारण सभेत हा भंडाफोड करून मुल्ला यांनी एकप्रकारे सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाढत्या स्पिल ओव्हरच्या बोजामुळे नगरसेवकांना विकासकामासाठी निधी कधी आणि कसा मिळणार, याचे उत्तर देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून आले.
दायित्व कमी करण्यावर भर...
हा तांत्रिक मुद्दा असून दायित्व हळूहळू कमी करण्यावर आमचा भर आहे. 72 ब नुसार आलेले प्रस्ताव किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा तातडीच्या आयत्या वेळच्या बजेट व्यतिरिक्तच्या कामांसाठी तत्वतः मी सहमत नाही. अत्यावश्यक निधी औषधाप्रमाणे वापरा, जेवणासारखे नको. त्याचा खूप बारकाईने आणि विचारपूर्वक वापर केला पाहिजे. यावर महासभेनेचे अंतिम निर्णय घ्यावा असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे.