ठाणे: आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सतर्क राहून समन्वयाने पूर्वतयारी करावी. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा चोख असावा आणि आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदतीसाठी आपदा मित्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक 2026 समिती सभागृहात संपन्न झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
Raigad News: अवकाळी पावसाने महावितरणची यंत्रणा उद्ध्वस्तया बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे ऑडिट करावे. जलसंपदा विभागाने धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करावा. राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्सून काळात दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन प्रमुख घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डंपरची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
डॉ.पांचाळ यांनी आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची गतिशीलता तपासण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम घ्यावी. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने औषध साठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत अशा सूचना देवून आपत्ती निवारणासाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अनुदान उपलब्ध करून दिले जाईल,असे स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी यावेळी दरडप्रवण गावे, पूरप्रवण क्षेत्रे, नदीतील गाळ काढणे, औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा आणि शोध-बचाव साहित्याची उपलब्धता यांचा सविस्तर आढावा घेतला.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची माहिती दिली. सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना आपापल्या स्तरावर नियंत्रण कक्ष तातडीने स्थापन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे ऑडिट करावे. जलसंपदा विभागाने धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करावा. राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्सून काळात दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन प्रमुख घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डंपरची कायमस्वरूपी व्यवस्था करावी.- डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अध्यक्ष,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,तथा जिल्हाधिकारी