

रायगड: गेल्या 8 आणि 9 मे रोजी सायंकाळच्या सुमारास पनवेल ग्रामीण, कर्जत आणि खालापूर परिसरात आलेल्या अवकाळी वादळी पावसाने महावितरणच्या वीज यंत्रणेची दाणादाण उडवली. वेगाने वाहणारे वारे आणि पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते, तारा तुटून पडल्याने शेकडो गावे अंधारात बुडाली होती.
मात्र, महावितरणच्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे पूर्ण करुन वीज पुरवठा पूर्ववत सूरु केला असल्याची माहिती महावितरणच्या पेण मंडळाचे अधिक्षक अधिक्षक अभियंता धनराज बिक्कड यांनी दिली आहे.
कर्जत तालुक्याला या वादळी पावसाचा मोठा फटका बसला. तालुक्यांतील 22 उच्चदाब आणि 6 लघुदाब वीजेचे खांब जमीनदोस्त झाले होते. प्रामुख्याने खांडस आणि डिक्सळ उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. उपकार्यकारी अभियंता व जनमित्रांच्या अथक परिश्रमानंतर वारेगाव, लवाणी रोड आणि तिवाने येथील वीज पुरवठा सुरू करण्यात यश आले आहे. सध्या कोशाणे व दहिवडी येथील काम पूर्ण करुन वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येत आहे.
महावितरण कंपनीच्या खोपोली उपविभागात 5 वीजेचे खांब कोसळून झाडे तारांवर पडल्याने पालीफाटा, साजगाव, मुळगाव व रानसई वाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता. महावितरणने कौशल्याने काम करत औद्योगिक क्षेत्राचा वीज पुरवठा अवघ्या एका तासात पूर्ववत करुन, औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन प्रक्रीयेवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही हे आपले धेय्य साध्य करण्यात यश मिळवले आहे.
खालापूर उपविभागात सर्वाधिक नुकसान झाले होते. 9 उच्चदाब व 17 लघुदाब पोल पडले होते. चौक, वावडळ, लोधीवली यांसह 10 हून अधिक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. जनमित्र बामणे, डुकरे, नारायण, गोविंद, नाकशे, महाजन आणि पूजा यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 10 मे रोजी पहाटे 3 वाजेपर्यंत सलग काम करून चौक वाहिनीचा विज पुरवठा सुरू करण्यात यश मिळवले.
कर्नाळ्यात तांत्रिक अडथळे
एकूण वीजेचे 8 पोल कोसळले होते. झाडे पडल्याने आपटा, कर्नाळा आणि अजिवली भागातील वीज वाहिन्या विस्कळीत झाल्या होत्या. कर्नाळा अभयारण्य क्षेत्रात वीज वाहक तारा तुटल्याने तिथे काम करण्यास काही तांत्रिक अडचणी आल्या.