ठाणे : ठाणे शहरासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरणारी वडाळा-कासार वडवली ही मेट्रो 4 सुरू होण्याची डिसेंबरची डेडलाईन हुकली असून स्थानकांची कामे, गर्डर बसवण्याची कामे अद्यापही सुरू असल्याने ही मेट्रो सुरू होण्यास आणखी सहा महिने लागणार आहेत. भांडुप, कांजूरमार्ग भागात गर्डर बसविण्याचे काम मागील आठवड्यापर्यंत सुरू होते, याशिवाय याभागात मेट्रो स्थानकांची कामे अद्यापही सुरू आहेत. अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे ठाणे शहरवासीयांसाठी महत्वाची ठरणारी ही मेट्रो कामाच्या दिरंगाईमुळे लांबली आहे.
ही मेट्रो वडाळ्यावरून कासारवडवलीपर्यंत धावणार आहे. या मेट्रोवर वडाळ्यापासून कासारवडवलीपर्यंत जवळपास 11 स्थानके आहेत. ठाणे शहरवासीयांसाठी ही महत्वाची मेट्रो असून घोडबंदर भागात होणारी वाहतूक कोंडी आणि निम्मे शहरवासीय राहत असलेल्या भागातील चाकरमान्यांची होणारी दररोजची कोंडी या मेट्रोमुळे सुटू शकणार आहे. परंतु मेट्रोचे काम रेंगाळले असल्याने शहरवासीयांची मोठी कोंडी होताना दिसत आहे. ही मेट्रो मध्यरेल्वेच्या स्थानकांना जोडली जाणार आहे. दादर, भांडुप, कांजूरमार्ग ही मेट्रो जोडली जाणार असल्याने याचा मोठा फायदा रेल्वे प्रवाशांना होणार आहे.
ही मेट्रो वाहतुकीला महत्वाची असल्याने ठाणेकरांच्या सेवेत ती लवकर दाखल होईल, असे सांगत परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रथम डिसेंबर नंतर 15 जानेवारीची मुदत दिली होती, मात्र ही डेडलाईन हुकली आहे.
मेट्रोची स्थानके नवीन डिझाईनची करण्यात आली असून स्थानकांच्या खाली एसटी परिवहन बसेसचा थांबा असणार आहे. मात्र या मेट्रोच्या निम्म्या स्थानकांचे काम बाकी आहे. त्यामुळे मेट्रोचे दोनवेळचे मुहुर्त हुकले आहेत. या मेट्रोवर तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजीवडा, कापूरबावडी मानपाडा, टिकुजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, ओवळा ही स्थानके आहेत. तर मुंबईकडे मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, माटुंगा, दादर, वडाळा अशी स्थानके असणार आहेत. ही मेट्रो लवकर सुरू व्हावी यासाठी प्रवाशांची मागणी आहे.
यातील पहिला टप्पा हा गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा ठेवण्यात आला आहे. या मेट्रोवर एकूण 32 स्थानके आहेत. तर 32. 32 किमीचा हा मार्ग आहे. मुंबई भागातील काम मोठ्या प्रमाणात रखडल्याने या मेट्रोला उशीर होत आहे. या मेट्रोची चाचणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. यावेळी कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा टप्पा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र हे काम अद्याप सुरू झालेले नाही. सहा स्थानकांसाठी हा ट्राय रन घेण्यात आला होता.
महापालिका निवडणुकीपूर्वी तो सुरू करण्याचा निर्णय जाहीर झाला होता. परंतु त्याची कार्यवाही रखडलेल्या कामामुळे थांबली आहे. या मेट्रोचा विस्तार हा मीरा भाईंदरपर्यंत करण्यात आला आहे. देशातील सर्वात लांब मेट्रो मार्गिंका म्हणून याचा उल्लेख आहे. या मेट्रोचा विस्तार केल्यास ती 58 किमी लांबीचा होणार आहे. मुंबई, ठाणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ही मेट्रो असणार आहे. ऑक्टोबर 2026 पर्यंत ही मेट्रो खुली होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ही मेट्रो होणार 58 किलोमीटरची...
घाटकोपर, मुलुंड, गायमुख एकूण लांबी 35 किमी असून यावर 32 स्थानके आहेत. 16 हजार खर्चाची ही मेट्रो आहे. या मेट्रोचा डेपो ढेघरपाडा येथे 45 हेक्टर जागेत होणार आहे. पूर्व आणि पश्चिम नगरे जोडणारी ही मेट्रो असून वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सला जोडणाऱ्या मेट्रो 11 याला मेट्रो 4 जोडली जाणार आहे. त्यामुळे ही लांबी 58 किलोमीटर होईल. 13 लाखांपेक्षा जास्त प्रवासी संख्या या मेट्रोला मिळेल, असे प्रकल्प अहवालात नमूद करण्यात आले आहे. डिसेंबर 2026 पर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे खुले होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.