ठाणे: ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळीत वाढ करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज दिले. ठाणे जिल्ह्यात २०२५-२६ या वर्षात १६ जलसाठ्यांमधून ४५ हजार ७१७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात मृद व जलसंधारण विभागाची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज संपन्न झाली, या बैठकीत ठाणे जिल्हा जलसंधारण अधिकारी व संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यातील १३७४ प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला, ज्यापैकी तब्बल १३११ (९५.४ टक्के) कामे पूर्ण झाली असून एकूण ४४ कोटी १४ लाख ९९ हजार रुपयांच्या निधी नियोजनातून विविध विभागांनी गतीने कामे केली आहेत.
तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत शहापूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींमधील ९ गावांमध्ये ७६३.६९ लाख रुपये किमतीच्या एकूण २०८ कामांपैकी १८३ कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून ग्रामीण भागात महिला बचत गटांना १ कोटी ८ लाख ४० हजार रुपयांचे थेट निधी वितरण करण्यात आले आहे.
यासोबतच, राज्यात कायमस्वरूपी लागू करण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ आणि ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या अत्यंत महत्त्वाच्या योजनेवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. १० वर्षांपेक्षा जुन्या जलसाठ्यांमधील गाळ काढून जलधारण क्षमता वाढवण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
ठाणे जिल्ह्यात सन २०२५-२६ मध्ये १६ जलसाठ्यांमधून ४५ हजार ७१७ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. आगामी वर्ष २०२६-२७ साठी जिल्ह्यात ६८ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, १५ जुलैपूर्वी आणखी २० कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मुरबाड तालुक्यातील वैशाखरे येथील पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, मांडवत आणि जायगाव येथील नाला खोलीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत, ज्यांची नोंद 'अवनी ॲप'वर अद्ययावत केली जात आहे.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व यंत्रणांना समन्वय ठेवून, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तातडीने दूर करून सर्व जलसंधारणाची कामे वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.