ठाणे : ठाणे महानगरपालिका प्रशासनाने ऐन पावसाळ्यात मलवाहिनी, चेंबर्स आणि मलटाक्यांमधील चोकप काढण्याचे काम करणाऱ्या चार नेट्टींग गाड्या अचानक बंद केल्याने शहरातील चेंबर्स आणि मलवाहिन्या स्वच्छ करायच्या कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या मलवाहिन्या साफ न झाल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने याची दखल घेण्याची मागणी श्रमिक जनता संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
ठाणे महापालिका मलनिस्सारण व यांत्रिक विभागामार्फत शहरातील मलवाहिनी, चेंबर्स, मलटाक्यांमधील चोकप काढण्याचे काम करण्यात येते. यासाठी जेटिंग गाड्यांच्या माध्यमातून २००९ पासून अनेक वर्षे नागरिकांना तात्काळ सेवा मिळत होती. मात्र या गाड्यांचे १५ वर्षे आयुष्य झाल्याने या चार गाड्या आता बंद करण्यात आल्या आहेत. या गाड्या आऊट डेटेड झाल्याची मनपा प्रशासन यांना कल्पना होती. परंतु महापालिकेच्या मलनिस्सारण आणि यांत्रिक विभागला याबाबत माहिती असतांनाही नवीन गाड्यांची व्यवस्था न करता अचानक या गाड्यांचे आयुष्य संपल्याचे कारण पुढे करून १ जुलै पासून अचानकपणे चार जेटिंग गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याशी खेळतांनाच त्या गाड्यांवर कार्यरत सफाई कर्मचारी आणि वाहनचालक यांना पुरेसे वेळेस आगोदर नोटीस कंत्राटदार किंवा मनपा अधिकारी यांनी न दिल्याने अचानक या कामगारांवर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गांभीयनि दखल घेऊन ठाणेकरांसमोर येऊन ठेपलेल्या संकटातून सुटका करावी, युनियन तर्फे मुख्यमंत्री, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना जगदीश खैरालिया यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.