ठाणे : तरुण पिढीमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानुसार विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आज निवासी जिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला असता ठाणे शहरात नोव्हेंबरमध्ये एकूण ८ कोटी २४ लाख ४९ हजार ६७० चा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्त करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीस पोलीस आयुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, ऑद्यौगिक सुरक्षा कार्यालय, कल्यण, ठाणे, जिल्हा आरोग्य कार्यालय, ठाणे, जिल्हा शिक्षण विभाग, ठाणे (प्राथमिक व माध्यमिक), शिक्षण अधिकारी, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर व कल्याण महानगरपालिका, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, ठाणे, जिल्हा कृषि अधिक्षक, ठाणे, उपवन संरक्षक कार्यालय, ठाणे, सह. आयुक्त केंद्रीय व सेवा कर विभाग ठाणे, उपविभागीय दंडाधिकारी भिवंडी, अन्न व औषध प्रशासन विभाग, ठाणे, जिल्हा शैल्यचिकित्सक ठाणे, जिल्हा माहिती कार्यालय ठाणे, सहायक अधिक्षक टपाल विभाग, ठाणे, नशा मुक्ती मंडळ महाराष्ट्र राज्य अशा विविध विभागातील अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे शहरात नोव्हेंबरमध्ये एकूण ८ कोटी २४ लाख ४९ हजार ६७० चा अंमली पदार्थांचा मुद्देमाल जप्तकरुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रभावी कारवाईबद्दल निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले. माहे नोव्हेंबर २०२५ मध्ये मिरा-भाईंदर मध्ये २९ लाख १७हजार ७८०, नवी मुंबईत १ कोटी ५१ लाख ५० हजार ६०० किंमतीच्या अंमली पदार्थांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये कोकेन, गांजा, चरस, एमडीए पावडर, मोफोड्रॉन, कफ सीरफ बॉटल्स, नशेच्या गोळया अशा अंमली पदार्थांचा समावेश आहे.
या ठिकाणी झाल्या तपासण्या
ठाणे पोलीस दलाकडून नोव्हेंबर २०२५ मध्ये ठाणे शहर, मिरा-भाईंदर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई या भागातील विविध ठिकाणी असलेले ४८ गोडाऊन, ५२ कंपन्या, २० व्यसनमुक्ती केंद्रे, ८३ फार्म हाऊस, ७० रासायनिक कारखाने, ११२ बंद पडलेल्या कंपन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.
गैरव्यवहाराबद्दल १९३३ या हेल्पलाईन
आपल्या परिसरात निदर्शनात येत असलेल्या अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराबद्दल नागरिकांनी १९३३ या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांनी केली आहे.