KDMC Anti Encroachment
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाईला फेरीवाला संघटने तीव्र विरोध केला आहे. शहर पथ विक्रेता अधिनियम २०१४ चे पालन न करता फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई केली जात असल्याचा आरोप शहर पथविक्रेता समितीचे सदस्य भालचंद्र उर्फ भाऊ पाटील यांनी केला आहे.
अशा एकतर्फी कारवाईच्या निषेधार्थ येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी शेकडो फेरीवाल्यांचा डोंबिवलीतील फ प्रभाग क्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी दिला आहे.
डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांमुळे होणारी गर्दी आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. तथापी या कारवाईदरम्यान शहर पथ विक्रेता अधिनियम २०१४ मधील तरतुदींचे पालन केले जात नसल्याचा दावा फेरीवाला संघटने केला आहे.
या पार्श्वभूमीवर फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे आणि शहर पथविक्रेता समितीचे सदस्य भालचंद्र उर्फ भाऊ पाटील यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी फेरीवाल्यांच्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
फेरीवाल्यांवर कारवाई करण्यापूर्वी कायद्यानुसार आवश्यक प्रक्रिया राबविणे, पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे तसेच त्यांच्यासाठी योग्य जागा निश्चित करणे आवश्यक असल्याचे भाऊ पाटील यांनी सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या निदर्शनास आणून दिले. केवळ कारवाई करून फेरीवाल्यांचा प्रश्न सुटणार नसून, त्यांच्यासाठी पर्यायी जागा आणि पुनर्वसनाचे धोरण निश्चित करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रशासनाकडून फेरीवाल्यांवरील अन्यायकारक कारवाई सुरूच राहिली आणि फेरीवाल्यांसाठी पुनर्वसन धोरण तसेच जागा निश्चित करण्यात आली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा बबन कांबळे यांनी दिला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी शेकडो फेरीवाले एकत्र येऊन फ प्रभाग क्षेत्र कार्यालयावर धडक मोर्चा काढतील, असे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.