ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्रांचा आतंक वाढला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या भटक्या कुत्र्यांच्या वाढीस कुत्र्यांच्या निर्बिणीकरण योजनेतील घोटाळा जबाबदार आहे. तसेच ठाण्यातील प्राण्यांच्या अवयवांची तस्करी केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांनी केली. तर भटक्या कुत्र्यांप्रकरणी पशु वैद्यकीय अधिकऱ्यांना लक्ष करीत सर्व पक्षीय नगरसेवकांनी कारवाईची मागणी केली. मात्र याप्रकरणी प्रशासनाने उत्तर देणे टाळून संबंधित अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात ४० ते ५० हजार भटकी कुत्री आहेत. त्यामुळे एक कोटी खर्च करून उड्डाणपुलाखाली भटक्या प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी शेल्टर उभारण्याचा प्रस्ताव आणला. त्या प्रस्तावावर चर्चा करताना सर्व पक्षीय सदस्यांनी पशु वैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर यांच्यावर कार्यपद्धतीवर टीका करीत त्यांच्यावर कुत्र्यांच्या निर्बीजीकरणात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला. या योजनेची चौकशी करून डॉक्टर शिरोडकर यांच्यावर कारवाईची मागणी मृणाल पेंडसे, संजय भोईर, राजेश मोरे, मढवी, एकता भोईर, सुधीर भगत त्यांच्यासह सदस्यांनी केली.
यावेळी बोलताना राजेश मोरे यांनी ठाण्यातील भटक्या कुत्र्यांच्या अवयवांची दुसरीकडे तस्करी केली जात आहे. त्यांचे अवयव काढून दुसरीकडे पुरविले जातात. त्यामध्ये एनजीओची काही मंडळी सहभागी असल्याचा आरोप मोरे यांनी करून कचराळी तलावात २०० मांजरे सोडण्यात आली असून काही प्राणी मित्र त्यांना मांस खायला घालतात. तेव्हा तेथील मंदिराची पवित्रता जपली जात नसल्याची चिंता व्यक्त केली. भटक्या प्राण्यांना दत्तक घेण्याची तयारी अनेक व्यक्तींची असताना पालिकेचे अधिकारी मांजरांना दत्तक देत नाहीत, असा आरोपही राजेश मोरे यांनी केला.
तर ठाण्यातील ४० ते ५० हजार भटक्या कुत्र्यांचे पुनर्वसन हे उड्डाणपुलाखालील छोट्याश्या केंद्रात होऊ शकते का ? असा प्रश्न भाजपचे मनोहर डुंबरे यांनी विचारत प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबाबत संजय भोईर यांनी सभागृहाला गंभीर बाबी स्पष्ट करीत डॉ. क्षमा शिरोडकर यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्या नागरिकांना चांगली वागणूक देत नसून पाळीव प्राण्यांसाठी वेगळा भूखंड ठेवण्याची सूचना केली. तर ठाण्यातील कुत्र्यांची निर्बीजीकरण केले जात असून या नस बंदीमध्ये घोटाळा होत आहे. ठेकेदाराला फायदा होण्यासाठी वारंवार नसबंदीचा ठेका दिला जात आहे. संबंधित ठेकेदाराकडून कुत्र्यांची अपेक्षित नसबंदी होत नसल्याने कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची चौकशी करावी अशी मागणी मृणाल पेंडसे यांनी केली. तसेच सभागृहात डॉ. क्षमा शिरोडकर यांना हजर राहण्यास सांगितले. मात्र विषय मंजूर होईपर्यंत डॉ. शिरोडकर सभेत उपस्थित राहिल्या नाहीत. तसेच भटक्या कुत्र्यांबाबत झालेल्या आरोपांवर प्रशासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाही. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी निर्णय देण्यापूर्वीच विषय गुंडाळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.