ठाणे: ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाची भव्य इमारत उभी राहिली असली तरी अपुऱ्या पदभरतीचा फटका आरोग्य यंत्रणेला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रुग्णालयातील पदभरती एकाचवेळी व्हावी, जेणेकरून जिल्ह्यातील रुग्णांना परिपूर्ण सेवा मिळेल, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.
आमदार संजय केळकर यांनी सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजे सिव्हिल रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. पाहणी दरम्यान स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी, उषा वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.केळकर यांनी परिपूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी डॉ.पवार यांनी सूचना केल्या. पाहणीनंतर श्री. केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, इमारत भव्य आणि सुसज्ज झाली असली तरी ते सुरू होण्यास आणखी सहा महिने जाऊ शकतात. ९०० रुग्णशय्या क्षमतेच्या या रुग्णालयात २६०० पदांची मंजुरी आहे, पण सध्या फक्त १०५० पदांचीच भरती होणार आहे.
त्यामुळे आरोग्य क्षमतेच्या तुलनेत मनुष्यबळ कमी होणार असल्याने ठाणे जिल्ह्यातील रुग्णांना परिपूर्ण आरोग्यसेवा मिळणार नसल्याची शक्यता श्री. केळकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे मनुष्यबळाअभावी येथील रुग्णांना ठाण्याबाहेर जाण्याची पाळी येऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याबाबत आरोग्य संचालकांशी चर्चा झाली असून संपूर्ण २६०० पदांची भरती एकाचवेळी करण्यात यावी, तसेच भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, अशी मागणी केल्याचेही श्री.केळकर यांनी सांगितले.